वृत्तसंस्था/ चेन्नई :
कलंकित माजी भारतीय स्पीडस्टार एस. श्रीशांत सप्टेंबरमध्ये बंदी संपुष्टात आल्यानंतर राज्य क्रिकेट संघातून खेळू शकतो, असे केरळ राज्य संघाचे प्रशिक्षक टिनू योहानन यांनी जाहीर केले. श्रीशांतवरील बंदी सप्टेंबरमध्ये संपते. त्यानंतर त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली तर त्याचा निश्चितपणाने विचार होईल, असे योहानन म्हणाले.
37 वर्षीय श्रीशांतवर बीसीसीआयने ऑगस्ट 2013 मध्ये आजीवन बंदी लादली. त्या वर्षापूर्वी त्याच्यावर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्ंिसग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. अर्थात, नंतर बीसीसीआय ओम्बुडस्मन डी. के. जैन यांनी आजीवन बंदीची शिक्षा शिथिल करत ती 7 वर्षांवर आणली.
‘श्रीशांतचा यंदाच्या रणजी चषक स्पर्धेसाठी विचार होईल. श्रीशांतला केरळ संघातून मैदानात उतरवण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. माझ्याप्रमाणेच केरळमधील प्रत्येक चाहता या क्षणाची प्रतीक्षा करत आहे’, असे योहाननने नमूद केले.
स्वतः योहाननने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
‘श्रीशांतवरील बंदी सप्टेंबरमध्ये संपुष्टात येत आहे आणि पूर्वतयारी, सुसज्जतेसाठी त्याच्याकडे बराच वेळ आहे. सध्या तो आपल्या खेळावर व आपल्या तंदुरुस्तीवर बरीच मेहनत घेत आहे’, अशी पुष्टी त्यांनी पुढे जोडली.
यंदाचा भारतातील प्रथमश्रेणी हंगाम ऑगस्टमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.
सध्या सराव केव्हा सुरु होणार, प्रत्यक्ष सामने केव्हा होणार, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे प्रतीक्षा करणे हा एकच पर्याय आहे, असेही योहानन म्हणाले. श्रीशांत सातत्याने आपल्या संपर्कात असून तो आपली गोलंदाजी व तंदुरुस्तीवर बरीच मेहनत घेत आहे. अर्थात, मागील 7 वर्षांपासून तो व्यावसायिक क्रिकेट अजिबात खेळलेला नसल्याने आम्हाला त्याची तंदुरुस्ती व कौशल्य नव्याने पारखून पहावे लागेल, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला. श्रीशांतने भारतीय संघातर्फे 27 कसोटी सामन्यात 87 व 53 वनडे सामन्यात 75 बळी घेतले आहेत. याशिवाय, त्याने 10 टी-20 सामन्यात 7 बळी घेतले आहेत.