कृष्ण सुखरूप परत आला याचा द्वारकावासियांना किती आनंद झाला याचे वर्णन करताना महामुनी शुकदेव पुढे म्हणतात-मेलेला माणूस पुन्हा जिवंत होऊन स्वर्गातून परत यावा इतका परमानंद कृष्णाला पाहून द्वारकावासियांना झाला. कृष्ण व जाम्बवंती हे जोडपे पाहून त्यांची मने शांत झाली. कंठात स्यमंतकमणी धारण केलेला कृष्ण व सोबत लावण्याची खाण असलेली जाम्बवंती पाहून त्यांच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. लोक साखर वाटू लागले. उत्सव साजरे करू लागले. जाम्बवतीचा विधिपूर्वक गृहप्रवेश झाला. घरोघरी आनंद झाला.
यानंतरें एके दिवसीं । उग्रसेनभूपतीपासीं । यादवें सहित हृषीकेशी । सुधर्मासदसीं उपविष्ट ।वृत्तान्त राजया करूनि विद्त। मिथ्याभिशापक्षालनार्थ। पाचारिजे सत्राजित । म्हणतां दूत पाठविले । नृपासन्निध सभास्थानीं । सत्राजितातें पाचारूनी। यादवांसहित चक्रपाणि। अभ्युत्थानीं सम्मानी । सभे बैसला सत्राजित । प्रसंगें मणीची काढिली मात। जनपदवदनें पूर्वींच विदित। विवरापर्यंत गवेषणा । विवरिं प्रवेशल्यानंतरें। वर्तले कथेचीं उत्तरें । स्वमुखें कथिलीं रुक्मिणीवरें। संपूर्ण नगरें परिसावया । स्यमंतकमणीचें दर्शन । जाम्बवतासीं बाहुकंदन । जाम्बवतीचें पाणिग्रहण । पुनरागमन मणिसहित।आम्हीं प्रसेन वधिला नसतां। मिथ्यापवाद माझिया माथां । सर्वां विदित वर्तली कथा । निर्दोष आतां कीं नाहो ।सत्राजिताकारणें मणि । देता झाला चक्रपाणि । कलंक निरसला येथोनी । झाला मूर्ध्नि उजळता ।सत्राजितें तियें वचनें। सभेमाजी ऐकतां श्रवणें । लज्जा पावला अंतःकरणें। तीं सर्वज्ञेsं परिसावीं।त्यानंतर एके दिवशी राजा उग्रसेन, सुधर्मा, इतर ज्ये÷ यादव व कृष्ण एका सभेत उपस्थित होते. त्यावेळी स्यमंतकमणी प्रकरणी कृष्णावर जे आरोप लावण्यात आले होते त्याच्या क्षालनार्थ सत्राजिताला बोलविण्यात यावे असे ठरले. त्याप्रमाणे दूत पाठविले. राजसभा बोलाविण्यात आली. राजा उग्रसेनासमक्ष सत्राजित व स्वतः कृष्णही हजर झाले. राजा उग्रसेन म्हणाले-सर्वांना स्यमंतकमणी प्रकरणी पूर्वी काय काय घडले हे माहीतच आहे. आता कृष्णाने जांबवंताच्या विवरात शिरल्यावर काय घडले हे सांगावे व ते सर्व नगरवासियांनी ऐकावे. त्यानुसार कृष्णाने निवेदन केले -विवरात मला स्यमंतकमणी दिसला. तो मिळवण्यासाठी मी गेलो असता जाम्बवंताबरोबर अठ्ठावीस दिवसरात्रपर्यंत अविरत घनघोर द्वंद्वयुद्ध करावे लागले. अखेर जाम्बवंत शरण आला. त्याने आपली कन्या जाम्बवंती हिच्याबरोबर माझा विवाह लावून दिला व लग्नात आंदण म्हणून स्यमंतकमणी मला दिला. त्यानंतर स्यमंतकमणी व जाम्बवंतीसह मी द्वारकेत परत आलो. आम्ही प्रसेनाचा वध केला नाही. स्यमंतकमणी चोरला नाही. पण माझ्यावर खोटा आळ घेण्यात आला. आतातरी हा आरोप पुसला जाणार की नाही, असे म्हणून कृष्णाने स्यमंतकमणी सत्राजिताच्या स्वाधीन केला. त्याच्यावरचा कलंक पुसला गेला व त्याची कीर्ती उजळून निघाली. सत्राजिताला मात्र सभेत घडलेल्या या साऱया प्रसंगामुळे लाज वाटू लागली.
आपुलें कृतापराधपाप । तेणें पावला अनुताप ।
महत्त्वाचा झाला लोप । सलज्ज सकंप सभास्थानीं ।
Ad. देवदत्त परुळेकर