20 जुलै रोजी टोकियोला करणार प्रयाण : आंतरराष्ट्रीय हॉकी पंच आहेत शेख
- रिओ ऑलम्पिकनंतर टोकियो ऑलम्पिकसाठी निवड
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वेळचे टोकियो ऑलम्पिक निश्चितपणे ‘चॅलेंजिंग’ राहणार आहे. या चॅलेंजला सामोरं जायची सर्व तयारी पूर्ण झाली झाल्याची माहिती टोकियो ऑलम्पिकसाठी निवड झालेले सिंधुदुर्गचे सुपुत्र व आंतरराष्ट्रीय हॉकी पंच जावेद नरुद्दीन शेख यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. 20 जुलै रोजी ते या ऑलम्पिकसाठी भारतातून टोकियोला रवाना होणार आहेत.
सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या जावेद शेख यांचे हे दुसरे ऑलम्पिक असणार आहे. त्यांनी मागील रिओ ऑलम्पिकमध्ये हॉकी पंच म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. ऑलम्पिकसाठी निवड होणारे ते कोकणचे एकमेव सुपुत्र होत.
आपल्या या दुसऱया ऑलम्पिक वारीबद्दल बोलताना जावेद म्हणाले, अगदी अलिकडेपर्यंत जपानमधील हे ऑलम्पिक होणार की नाही, याबद्दल साशंकता होती. मात्र अलिकडच्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, त्याचबरोबर आपणास टोकियोला निघण्यासाठी 20 जुलैचे तिकिट प्राप्त झाल्याने आता ऑलम्पिक निश्चितपणे होईल, याची खात्री वाटू लागली आहे. त्या दृष्टीने आम्ही तयारीही सुरू ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. भारत ते हाँगकाँग आणि हाँगकाँग ते टोकियो असा आमचा प्रवास राहणार, असे ते म्हणाले.
नुकतीच या ऑलम्पिकच्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनची बैठक झाली. या बैठकीत टोकियोमध्ये गेल्यानंतर तिथे कसं राहायचं, कुठे राहायचं, याबाबत माहिती देण्यात आली. या माहितीमध्ये या ऑलम्पिकसाठी भारतातून निघण्यापूर्वी चार दिवस अगोदर एक कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. त्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर हॉटेल ते मैदान या व्यतिरिक्त आपणास कोठेही फिरता येणार नाही. सामन्याच्या पंचगिरीसाठी जेवढा वेळ ग्राऊंडवर जावे लागेल, तेवढय़ावेळा ऍन्टीजेन टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. दर चार दिवसांनी आरटीपीसीआर टेस्टही करावी लागणार असल्याचे ते म्हणाले. आपल्यासाठी बूक करण्यात आलेल्या टोकियोतील हॉटेलचे दोन माळे फक्त हॉकीशी संबंधित खेळाडू, पंच आणि ऑफिशिअर्स यांच्यासाठी रिझर्व्ह ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सामन्यासाठी पंचगिरीकरीता आवश्यक असलेल्या फिटनेसबाबत माहिती देताना ते पुढे म्हणाले, या ऑलम्पिकसाठी निवड झालेल्या आम्हा पंचांना दर दोन महिन्यांनी फिटनेस टेस्टचा रिपोर्ट इंटरनॅशनल पंच पॅनलला पाठवून द्यावा लागतो. आता फिटनेसच्या बाबतीत म्हणायचं, तर आतापर्यंत जे काही चाललंय, ते योग्य दिशेने चाललंय. दर पंधरा दिवसांनी बैठक आणि व्हीडिओसेशन करून अधिकाधिक माहिती घेतली जात आहे. जसं एखाद्या खेळाडूच्या बाबतीत ऑलम्पिक हे सर्वोच्च स्वप्न असतं, अगदी तसंच क्रीडा पंचांच्या बाबतीतही ऑलम्पिक स्वप्न हे सर्वोच्च स्वप्न असतं. आपलं हे दुसरं ऑलम्पिक असलं, तरी या ऑलम्पिकची उत्सुकताही प्रचंड ताणून राहिली आहे. ऑलम्पिकसाठी निवड होणं हा क्रीडा क्षेत्रातला एक सर्वोच्च सन्मान समजला जातो आणि हा सन्मान आपणास तब्बल दोनवेळा मिळतोय, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे ते म्हणाले.
जावेद शेख हे सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कलमठचे सुपुत्र असून ते मुंबई पोर्टट्रस्ट येथे काम करतात. यापूर्वी त्यांनी ऑलम्पिकबरोबरच दोनवेळा कॉमनवेल्थ, तीनवेळा आशियाई क्रीडास्पर्धा व दोनवेळा जागतिक हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे.