नगरसेवक वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कल्याण / प्रतिनिधी
ठाण्यात क्लस्टर योजनेच शुभारंभ करण्यात आल्याने ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. याच धर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत देखील क्लस्टर योजना लागू करावी, अशी मागणी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामे, धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढण्यासाठी क्लस्टर योजनेची मागणी केली जात होती. ठाणे शहरातील बहुचर्चित क्लस्टर योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे ठाण्यातील धोकादायक अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली निघणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात देखील क्लस्टर योजना लागू करण्याची मागणी केली जात असून लोकप्रतिनिधींकडून या मागणीचा शासनाकडे पाठपुरवा सुरू आहे. शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन सादर केले असून या निवेदनात कल्याण-डोंबिवली शहराचा अतिशय दाटीवाटीने विकास झाला आहे. शहरात मोठय़ा प्रमाणात आरक्षित भूखंडावर, सी. आर. झेड. आदी ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे पावसाळय़ात नागरिकांना जीव मुठीत धरून राहवे, लागत आहे. पावसाळय़ात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे हजारो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. शहरातील दाटीवाटीच्या ठिकाणी पुनर्विकास करायचा असेल आणि नवीन जागा निर्माण करायची असल्यास क्लस्टरच्या माध्यमातूनच ते शक्य आहे. क्लस्टर योजनेमुळे शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली निघू शकतो. त्यामुळे s ठाण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात देखील क्लस्टर योजना लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.