कोटय़वधीचे नुकसान, घातपाताची शक्यता, सर्व सामानासह रोकड व कारही भस्मसात, आग विझविण्यासाठी 4 बंबांचा वापर, अग्निशामक दलाचे अथक प्रयत्न
प्रतिनिधी /म्हापसा
मंगळवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास कळंगूट पंचायतीसमोरच असलेल्या बॉम्बे बाजार या शेडवजा गाळय़ांना आग लागली. या आगीत सुमारे एक कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या दुकानाच्या बाजूला पार्क करून ठेवलेली मारूती कारही आगीची झळक बसून भस्मसात झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ज्या पद्धतीने आग लागली आहे ती पाहता कुणीतरी आग लावली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
कळंगूट मतदारसंघात गेल्या दोन महिन्यापासून आगीचे सत्र सुरूच आहे. चार दिवसांपूर्वीच कांदोळी किनाऱयावरील शॅकची घटना ताजी असतानाच मंगळवारी पहाटे ही आगीची घटना घडली. यापूर्वी बागा येथेही अशाच प्रकारे आग लागून हॉटेल खाक झाले होते. एकूण हे घटनाक्रम पाहता या आगीबाबत संशय व्यक्त होत आहे.
याबाबत म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव, पीळर्ण स्थानकाचे अधिकारी रुपेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीळर्णचे सहाय्यक अधिकारी प्रदीप मांद्रेकर, श्यामसुंदर पाटील, नरेंद्र शेटय़े, जितेंद्र बली, श्रीकांत सावंत, रुद्रेश पांढरे, म्हापसा स्थानकाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत, विष्णू गावस, नितीन चोडणकर, इप्रिनो डायस, संजू कोरगांवकर, विष्णू नाईक, गिरीश गावस, मुख्यालयातील आग्नेल रॉड्रीगीस, हनुमंत नार्वेकर, रणजीत गांवकर, रोहीत उसापकर, परेश च्यारी यांनी आग विझवली.
आगीत 4 गाळे पूर्णतः खाक
चार दुकानांना लागलेल्या आगीत 1 कोटीचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक एडवीन रॉड्रीगीस यांनी दिली. बॉम्बे बाजार म्हणून ओळखले जाणारे दुकानाचे गाळे अनेक वर्षापासून या भागात कार्यरत होते. दुकानात झोपलेल्या कामगारांनी आगीची माहिती तात्काळ अग्निशामक दलाच्या केंद्राला देताच तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या पणजी, म्हापसा तसेच पीळर्ण येथील दलाच्या कर्मचाऱयांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. कळंगूट पंचायत मंडळाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीची माहिती घेतली तसेच दुकान मालकांना शक्यतो आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सरपंच शॉन मार्टीन्स यांनी सांगितले. दरम्यान कळंगूट परिसरात आगीच्या घटनात वाढ होत चालल्याने दुकान मालकांनी याबाबतीत अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
कारही जळून खाक
बॉम्बे बाजार दुकानामध्ये प्लास्टिक तसेच इतर सामान पूर्णतः भरले होते. येथे सर्व प्रकारचे सामान होते ते पूर्णतः जळून खाक झाले. याबाबत अधिक माहिती देताना दुकान मालक एडवीन म्हणाले की, दररोजच्या प्रमाणे आपण रात्री 8 वाजता दुकान बंद करून घरी गेलो होतो. पहाटे आपल्यास कामगारांनी दुकानाला आग लागल्याची माहिती दिल्यावर त्या ठिकाणी धाव घेतली. म्हापसा, पीळर्ण, मुख्यालयातील जवानांनी ही आग विझविण्यासाठी बरेच परिश्रम घेतले. याठिकाणी पार्क करून ठेवलेली कारही पूर्णतः जळून खाक झाली.