पंजाबमध्ये केजरीवालांचे विधान
वृत्तसंस्था / अमृतसर
पंजाबच्या दौऱयावर असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर मोठा शाब्दिक हल्ला चढविला आहे. अमृतसरमध्ये पत्रकार परिषद घेत केजरीवालांनी आम आदमी पक्षात आम्ही काँग्रेसचा कचरा घेऊ इच्छित नाही, अन्यथा संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे 25 आमदार आणि 2-3 खासदार आमच्या पक्षात आले असते असे विधान त्यांनी केले आहे.
प्रत्येक पक्षात उमेदवारी न मिळणारे नेते नाराज होत असतात, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो, यातील काही जणांना भूमिका पटते आणि काही जण नाराज होऊन अन्य पक्षामध्ये जातात असे केजरीवालांनी पंजाबमधील आप आमदारांच्या काँग्रेसप्रवेशाबद्दल बोलताना म्हटले आहे.
काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, पण आम्हाला काँग्रेसचा कचरा नको, काँग्रेसचे 25 आमदार आणि 2-3 खासदार आमच्या संपर्कात असून ते आम आदमी पक्षात संपर्क करू इच्छित आहेत. पण आम्ही या गलिच्छ राजकारणात पडू इच्छित नसल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.
पंजाब विधानसभेत आम आदमी पक्ष कमकुवत ठरला आहे. पक्षाच्या दोन आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भटिंडा ग्रामीण आमदार रुबी तसेच रायकोटचे आमादर जगतार सिंह यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे कौतुक करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करू
मागील वेळी 4 फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली होती. काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंह यांना एक आठवडा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून घोषित केले होते. काँग्रेसने अद्याप स्वतःचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार सांगितलेला नाही. नवज्योत सिंह सिद्धू का रंधावा मुख्यमंत्री होणार हे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. अन्य राजकीय पक्षांच्या पूर्वी आम आदमी पक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.
सिद्धूंचे कौतुक
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी राज्यात वाळू, वीज स्वस्त झाल्याचे सांगतात. तर नवज्योत सिंह सिद्धू व्यासपीठांवर येऊन चन्नी यांचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट करत आहेत. सत्य बोलण्यासाठी सिद्धू यांचे मी कौतुक करत असल्याचे केजरीवाल म्हणाले.