ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी एक तासाहून अधिक केलेल्या भाषणात काँग्रेसवर टीका आणि आरोपांचा भडिमार केला. याच टीकेवरुन आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी भाजपावर टीका केलीय. थरुर यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी केलेलं भाषण हे राजकीय होतं अशी टीका केलीय. “त्यांनी (पंतप्रधान मोदींनी) त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये केवळ काँग्रेसवर टीका केली. त्यांचं हे भाषण राजकीय होतं ज्यामधील बराचसा भाग हा काँग्रेसवर टीका करणारा होता. माझ्या मते आम्हाला आनंद झाला पाहिजे की ते आम्हाला या नजरेने पाहतात,” असा टोला थरुर यांनी लगावलाय. तसेच “काही वर्षांपूर्वी मी म्हणालो होतो की भाजपा हीच खरी ‘टुकडे टुकडे गँग’ आहे. त्यांनी हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या आधारे तर भाषेच्या आधारे उत्तर-दक्षिण भारत अशी दुही निर्माण केलीय. भाजपा हे विभाजन करत आहे,” असा टोलाही लगावलाय.