दिनेश गुंडू राव यांची घोषणा., जागा वाटपाबाबत अद्याप अनिश्चितता
प्रतिनिधी/ पणजी
गत कित्येक दिवसांपासून आज-उद्या करत लांबणीवर पडणाऱया काँग्रेस-गोवा फॉरवर्ड यांच्या युतीला अखेर शनिवारी मुहूर्त मिळाला व दोन्ही पक्षांदरम्यान युतीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र जागा वाटपाबाबतचा घोळ अद्याप कायम असून फॉरवर्डला जास्तीत जास्त तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दोन्ही पक्षांदरम्यान पणजीत शनिवारी झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी युतीची घोषणा केली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि अन्य पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर युतीशिवाय पर्याय नाही, या विचारांपर्यंत विरोधक आले आहेत. त्यादृष्टीने गोवा फॉरवर्ड व काँग्रेस यांच्यात युती व्हावी असा विचार समोर आला होता. परंतु मध्यंतरी फॉरवर्डने तृणमुलशी नाते जुळविण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. त्याशिवाय युती की विलीनीकरण? या मुद्यावरूनही बरेच चर्वितचर्वण झाले. हा निर्णय पक्का होईपर्यंत बराच मोठा कालावधी फुकट गेला व ही अस्थिरता पचनी न पडल्याने एका आमदाराने चक्क भाजपची कास धरली. त्यामुळे फॉरवर्डला मोठा धक्का बसला. त्यातून त्यांची संख्या दोनवर आली. तरीही कालच्या युतीच्या घोषणेवेळी आमदार विनोद पालयेकर यांची अनुपस्थिती सर्वांच्या भूवया उंचावणारी होती.
दरम्यान, काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी 30 नोव्हेंबर रोजी हिरवा कंदील दाखविल्यानंतर खऱया अर्थाने युतीची बोलणी पुढे सरकली होती. भाजपशी लढण्यासाठी व गोव्यात बदल घडवून आणण्यासाठी ही युती फार महत्वाची होती. आज आम्ही त्यात यशस्वी ठरलो याचा अत्यंत आनंद होत आहे. असे राव यांनी सांगितले. आता जनतेनेही स्थीर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जागा वाटपासंबंधी बोलताना त्यांनी, परस्पर चर्चेतून हा प्रश्न सोडविला जाईल, त्यासंदर्भात लवकरच घोषणा करण्यात येईल, असे राव म्हणाले.
विजय सरदेसाई यांनी त्यावेळी बोलताना, भाजप केवळ अधिगृहणे करण्यात व्यस्त आहे. भाजपची हुकुमशाही प्रचंड वाढली आहे. त्याहीपेक्षा जास्त भ्रष्टाचार वाढला आहे. काही मंत्री वासनाकांडात गुंतले आहेत. काहीजण नोकऱयांची विक्री करण्यात व्यस्त आहेत. या सर्वांपासून गोव्याला मुक्त करण्याची गरज आहे. त्यामुळे लोकांनी युतीला पाठिंबा द्यावा, असे सांगितले. भूतकाळात जे घडले ते विसरून उज्वल भविष्य घडविण्यासाठी पुढे जायचे आहे. गोवा खऱया अर्थाने मुक्त करायचा आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस व फॉरवर्डची विचारधारा एकच आहे. त्यामुळे भाजपविरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी अन्य समविचारी पक्षांनीही आमच्या सोबत यावे, असे आवाहन गिरीश चोडणकर यांनी केले.