नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाऊंडेशनचे आयोजन, संकट काळात महाराणी ताराराणी बनुन लढण्याची दिली ऊर्जा
ऑनलाईन टीम/तरुण भारत
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कागलमध्ये ऋदयस्पर्शी भाऊबीज सोहळा शनिवारी संपन्न झाला. अतिशय भावनिक अशा या सोहळ्यात कोरोना काळात सौभाग्य गमावलेल्या साडेआठशेहून अधिक बहिणींनी आपला लाडका भाऊ हसन मुश्रीफ यांचे औक्षण केले. नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शूर महाराणी ताराराणी यांच्याप्रमाणे लढाऊ बाण्याने जिद्दीने लढा, अशी ऊर्जाही त्यांनी उपस्थित माता-भगिनींना दिली.
भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले, तुमच्यावर कसलेही संकट आले तर तुमच्या भावाला फक्त एक हाक द्या. हरऐक परिस्थितीत तुमचा हा भाऊ तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या पाठीशी हिमालयासारखा उभा आहे. तुम्ही एकाकी नाही, असे ते यावेळी म्हणाले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीने सौभाग्य गमावलेल्या बहिणींसाठी ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – उमेदने वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा या नावाने नवी योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत अशा माता भगिनींनी स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानजनक उपजीविकेसाठी रोजगार, स्वयंरोजगार व व्यवसायासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण, बचत गटांसाठी बिनव्याजी कर्ज व अनुदान तसेच व्यवसायासाठीही निधी दिला जाणार आहे.
गहीवरल्या माता-भगिनी…
प्रत्येकाच्या घरी भाऊबिजेचा सन असतानाही माता -भगिनी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती लावली. कोरोना काळात सौभाग्य गमावलेल्या साडेआठशेहून अधिक माता-भगिनी सहभागी झाल्या. एकूणच हा सगळा सोहळा हृदयस्पर्शी आणि भावस्पर्शी होता. या बहिणीना ऊर्जा देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, तुमच्यावर आलेले संकट मोठे असले तरी डगमगू नका, खचून जाऊ नका. कारण, सासू-सासर्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे. दुःख बाजूला सारून कंबर कसून मुलाबाळांच्या भविष्यासाठी रणरागिनी बनून जिद्दीने उभे राहा, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित माता-भगिनी गहिवरल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
तर थेट मला फोन करा…
कोरोना महामारीमुळे सौभाग्य गमावलेल्या माझ्या हजारो बहिणींची ही पहिली दिवाळी आहे. त्यांना धीर द्यावा या भावनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अनाथ मुलांसाठी पाच लाख देण्याचे धोरण सरकारने ठरवले आहे. कुटुंब प्रमुख पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर वारसाहक्काने तातडीने त्याच्या पत्नीचे नाव घराच्या मालकी हक्कामध्ये लावायचे, त्याच्या शेतीची मालकी त्याच्या पत्नीच्या नावावर करायची, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ वृद्धापकाळ या सारख्या योजनांचा लाभ तातडीने द्यावयाचा तसेच घरकुलासह जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, या सर्व कामांत संदर्भात सरकारी अधिकारी, कर्मचारी ऐकत नसेल तर थेट मला फोन करा असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.