वार्ताहर / नंदगड
खानापूर तालुक्यातील सुगी अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने उत्पादन बऱयापैकी आले आहे. तरीही आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतकऱयांकडून भातविक्री होत आहे. याच संधीचा लाभ दलालानी उठवून कमी दराने भात खरेदी सुरू केली आहे. त्यातही काटमारी सुरू असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
खानापूर तालुक्यातील नंदगड, खानापूर, जांबोटी, कणकुंबी, रामगुरवाडी, निट्टूर, गर्लगुंजी, बरगांव, देवलत्ती, चापगाव, लालवाडी, गुंजी, लोंढा, कापोली, नागरगाळी, बिडी, बेकवाड, गोधोळी, कडतन बागेवाडी परिसरात भात पिकाचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी 35 हजार हेक्टर जमिनीत भातपीक घेतले जाते. त्यामध्ये 30 हजार हेक्टर जमिनीत भाताची पेरणी केली जाते. तर जांबोटी, कणकुंबी, चोर्ला, हेम्माडगा परिसरातील 5 हजार हेक्टर जमिनीत भाताची लावण केली जाते.
भात हे खानापूर तालुक्यातील मुख्य पीक आहे. यावर्षी पेरणीचा हंगाम बऱयापैकी आल्याने शेतकऱयांनी आपल्या शेतात भाताची पेरणी केली होती. सुरुवातीपासूनच भातपीक चांगले आले आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात वाढ झाली. परंतु मलप्रभा नदी काठावरील व काही तलावाच्या परिसरातील भातपीक पाण्याखाली गेल्याने थोडीफार नुकसान शेतकऱयांना सोसावे लागले. परंतु माळ रानावरील पिके यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने मोठय़ा प्रमाणात पिकली असून उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे.
भात खळय़ातच विक्री
इंटान, जया, मटाळगा, दोडगा, अभिलाषा, सोनम आदीसह अन्य काही जातींच्या भाताची लागवड करण्यात आली होती. गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र भात मळणीचा हंगाम सुरू आहे. मुळातच भात पिकविण्यासाठी शेणखत, रासायनिक खते, मजूर, ट्रक्टर भाडे यासाठी हजारो रुपये शेतकऱयांनी खर्च केले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आपल्याला खर्चासाठी रक्कम हवी यासाठी शेतातील खळय़ावरच भात विक्री सुरू केली आहे. याचाच लाभ दलालानी उठविला आहे.
काटामारी करणाऱया दलालाना शेतकऱयांचा विरोध
गतवर्षी मे-जूनमध्ये भाताला दोन ते अडीच हजाराचा क्विंटलला दर होता. तर आज हेच दलाल त्याच जातीचे भात अवघ्या दीड हजार क्विंटलने खरेदी करत आहेत. त्यामुळे क्विंटल मागे तब्बल पाचशे ते आठशे रु. ची नुकसान शेतकऱयांना होत आहे. त्यातच दलाल एवढय़ावर थांबले नाहीत, त्यांनी वजनातही काटमारी सुरू ठेवली आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक काटे आले आहेत. त्या वजन काटय़ावर भात खरेदी सुरू आहे. त्याचा रिमोट दलाल किंवा त्यांची माणसे आपल्या खिशात ठेवतात. आपणाला आवश्यक तेवढी काटमारी करुन घेण्याचा प्रकार यावेळी घडतो. शेतकऱयाना याची पुसटची कल्पना दिसून येत नाही. काही ठिकाणच्या शेतकऱयानी अशा प्रकाराना विरोध दर्शवून दलालानी खाली हाती पाठविले आहे.
भात केंद्रे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी
शासनाने यावर्षी काही पिकांना आधारभूत किमत जाहीर केली आहे. भाताला आधारभूत किमत जाहीर झाल्याचे कळते. परंतु त्याची जनजागृती तालुक्यातील शेतकऱयापर्यंत झालेली दिसत नाही. दरवर्षी बेळगाव व नंदगड एपीएमसी आवारात फेडरेशनतर्फे भात खरेदी करण्यात येत होती. गेल्या तीनवर्षापासून भात खरेदी केंद्रेच सुरू नसल्याने शेतकऱयांची कुंचबणा झाली होती. त्यामुळे कमी दराला व काटमारीला शेतकऱयांना सामोरे जावे लागले होते. यावर्षी लवकरात लवकर भात केंद्रे सुरू झाल्यास दलालांच्या काटमारीला लगाम बसून शेतकऱयाच्या भाताला बऱयापैकी दर मिळेल.
शेतकऱयाना वाली कोण?
भात खरेदी केंद्र सुरू करा, अशी गेल्या सातवर्षात अनेकवेळा निवेदन देण्यात आली. त्यानुसार सातवर्षात दोनवेळा भात खरेदी केंद्र सुरू होती. या तालुक्यात 75 टक्के लोक शेती व्यवसायात गुंतलेले असताना शेतकऱयांच्या लुटमारीकडे कुणीही लक्ष देत नाहीत. किंवा भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीत, हा शेतकऱयांना पडलेला प्रश्न आहे. शेतकऱयांना आपली फसवणूक होत आहे याची जाणीव असली तरी त्यांनी सयंमशिलता पाळली आहे.
भात खरेदी करण्याचे सरकारचे आश्वासन
भात खरेदी केंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन सरकारतर्फे शेतकऱयांना देण्यात आले आहे. सामान्य भातासाठी 1868 व उच्च प्रतीच्या भातासाठी 1888 रुपये दर जाहीर झाल्याचे कळते. परंतु अद्याप फेडरेशनचा कोणताही अधिकारी नंदगड एपीएमसीच्या कार्यालयात हजर झालेला नाही. त्यामुळे भात खरेदी प्रक्रियेबाबत काय होणार, आगामी काळातच कळणार आहे.