कित्येक ठिकाणी आठ – दहा दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित, ग्रामस्थ हैराण
प्रतिनिधी/ काणकोण
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच काणकोण तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तेंड देण्याचा प्रसंग जनतेवर आला आहे. पावसाला अजून सात महिने बाकी असताना जर ही परिस्थिती असेल, तर पुढे कसे होईल, असा सवाल माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी यांनी केला आहे. आपल्या राजबाग, किंदळेबाग वॉर्डात मागच्या आठ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असून दिवसातून एक किंवा दोन तास देखील पाणी मिळत नसल्याची कैफियत त्यांनी मांडली आहे.
चावडीवर मागच्या 10 दिवसांपासून पाणी गायब झालेले असून आम्ही कसे दिवस काढतो ते आपल्यालाच ठाऊक आहे, अशी कैफियत चावडीवरील आर. बी. एस. कोमरपंत यांनी मांडली. तर कर्वे-गावडोंगरी येथे मागच्या आठ दिवसांपासून पाणी गायब झाले असल्याची तक्रार येथील एक ज्येष्ठ नागरिक बाळसू देसाई यांनी मांडली. पैंगीण जिल्हा पंचायत मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यावेळी आपल्याजवळ या भागातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. नळाचे पाणी बंद झाल्यामुळे निदान टँकर तरी पाठवा अशी या भागातील लोकांची मागणी असून सरकारला जमत नसल्यास आपल्या खर्चाने पाण्याचा टँकर पुरविण्याचे आश्वासन आपण कर्वे येथील नागरिकांना दिले असल्याची माहिती गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव महादेव देसाई यांनी दिली.
पंप बिघडल्याचा परिणाम
वेलवाडा, पैंगीण, हत्तीपावल या भागांतील लोकांच्या देखील पिण्याच्या पाण्याच्या समस्या असून माजी नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, आर. बी. एस. कोमरपंत यांच्यासहित चावडीवरील 60 पेक्षा अधिक नागरिकांनी नुकतीच उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या कार्यालयाला भेट देऊन पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. पाणीपुरवठा खात्याचे कनिष्ठ अभियंता दीपराज मडकईकर यांना यावेळी बोलावून घेऊन चौकशी केली असता पंप बिघडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती मडकईकर यांनी दिली. येत्या एक-दोन दिवसांत परिस्थिती नियंत्रणाखाली येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.