आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कसे असतात, व्यापार कसा होतो, कोणत्या देशांशी होतो. आपल्या देशात महिला आणि मुलांना कापसाच्या शेतात कसे राबवून घेतले जाते अशी वेगळी मांडणी करणारे ‘कापूस सरकीपासून सुतापर्यंत’ हे पुस्तक राजीव जोशी यांनी लिहिले असून ते राजहंसने प्रकाशित केले आहे. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद!
प्रश्न-‘कापूस सरकीपासून सुतापर्यंत’ हे कापसाविषयीचे लिखाण का करावेसे वाटले?
कापूस मानवाच्या पाच मूलभूत गरजांमधील महत्त्वाचा घटक आहे. भारतात प्र्राचीन ग्रंथ समजल्या जाणाऱया ऋग्वेदात कापसाचा उल्लेख आहे. भारताचार्य वैद्य शं. बा. दीक्षित आदि महाभारताच्या अभ्यासकांनीही महाभारत काळात भारतातल्या कापूस आणि कापसाच्या व्यापाराचा उल्लेख केला आहे. पारतंत्र्यात असताना इंग्लंडमधील गिरण्यांना कापूस पुरवता यावा यासाठी ब्रिटिशांनी भारताचा कसा वापर केला. भारतातली ढाका मलमल कशी प्रसिद्ध होती. भारतात पहिली सूतगिरणी कुठे निघाली हा सर्व महत्त्वाचा इतिहास आहे. फाळणीनंतर कापूस उत्पादक प्र्रदेश पाकिस्तानात गेला आणि भारतात केवळ कापसाच्या गिरण्या राहिल्या. त्यांच्या गरजा पुरविण्यासाठी कापसाची मोठय़ा प्रमाणावर आयात करावी लागत असे. त्यात प्रचंड परकीय चलन जात असे. परिणामी देशातल्या कापूस गिरण्यांना कापूस पुरविण्यासाठी देशात कापूस उत्पादन वाढवण्याची गरज वाटू लागली. सरकारच्या व शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नाने आज भारत कापूस उत्पादन, खप आणि निर्यात यामधे जगात अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्र, कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रफळात देशात अव्वल स्थानावर मात्र सरासरी उत्पादकतेच्या बाबतीत, इतर राज्यांच्या तुलनेत, महाराष्ट्र खूपच मागे आहे. जास्तीत जास्त शेतकरी नगदी उत्पादन म्हणून कापसाच्या शेतीकडे वळतात हे खरे असले तरी शेतकऱयांच्या आत्महत्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक आहेत. पावसाची अनियमितता तर आहेच पण शेतकऱयांमधील अज्ञान, बी-बियाणे, खतांचा वापर याबाबतीतल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, सिंचनाच्या अपर्याप्त सुविधा यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर राहिला. कापसाचा व्यापार हा बहुतांशपणे गुजराथी वर्गाच्या हातात होता. कापसाच्या पेरणीच्या वेळी घ्यायची काळजी, रोग, आजार, उपाय, विपणन, देशातले आणि परदेशातले बाजारभाव याविषयी मराठीत कोणत्याही प्रकारचे लिखाण उपलब्ध नसल्यामुळे आणि जवळपास चार दशके हे सर्व जवळून पहात असल्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱयांसाठी धोरणकर्त्यांसाठी कापसाचा सरकीपासून सुतापर्यंत प्र्रवास लिहावा असे वाटले.
पुस्तकातले मर्म काय आहे?
सर्वसामान्यांना, धोरणकर्त्यांना, शेतकऱयांना कापूस कुठे पिकतो, त्याच्या जाती कोणत्या, कापसाचा शोध कोणी लावला यापासून देशात आणि परदेशातल्या कापसाच्या जाती, रोग, आजार, उपाय जैव तंत्रज्ञानाची झालेली सुरुवात त्याचे फायदे, तोटे आणि अज्ञान याचा विचार पुस्तकात आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बीटी बियाणांची पेरणी केली जाते. बीटीमुळे कापसाची उत्पादकता अनेक पटींनी वाढली आहे. पण ती शेजारील पाकिस्तानलाही ओलांडू शकली नाही. महाराष्ट्रातही उत्पादकता खूप कमी आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा सगळय़ा राज्यांमध्ये बीटीची पेरणी होते तेथे उत्पादकता वाढली आहे. पण आत्महत्या महाराष्ट्रात जास्त होतात. याचे कारण सिंचनाचा अभाव, आंतरपीक न घेणे, कोणत्या प्रकारच्या जमिनीत कोणता कापूस लावणे यासाठी शेतकऱयांना आणि संबंधितांना मार्गदर्शन न होणे अशा अनेक बाबी आहेत. महाराष्ट्रातला शेतकरी कापसाला मिळणाऱया भावामुळे कापसाच्या लागवडीकडे वळला आहे, क्षेत्रफळात त्यामुळे वाढ होत आहे. बदल कधी होऊ शकतात?
महाराष्ट्रात कापसाच्या लागवडीखालील फक्त 5-6 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. गुजरातमध्ये हे प्रमाण आज 30 टक्के आहे. सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यास शेतकऱयांच्या, उत्पादनखर्च वजा जाता, अमदानीत वाढ होईल. कापसाच्या प्र्रतीत सुधारणा होईल. शेतकऱयांना चांगला भाव मिळेल, निर्यातीत महाराष्ट्राच्या कापसाच्या मागणीत वाढ होईल. शेतकऱयांना किटकनाशकांचा कमीत कमी वापर कसा करावा, फवारणी कधी करावी याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चांगली बियाणे वेळेत व रास्त भावात देणे ही सुद्धा शासनाची जबाबदारी आहे. चांगली बियाणे दिल्यास चांगल्या प्रतीचा कापूस मिळू शकेल.
‘मराठीत अशा प्र्रकारचे लिखाण का होत नाही. लेखक अनुभवापर्यंत पोहचू शकत नाही का?
मराठीत कथा-कादंबरीतून लेखकांनी लिखाण करून शेतकऱयाच्या दैनावस्थेला वाचा फोडली आहे. अनेक कवीही कवितेतून ते मांडत आले आहेत. पण हा विषय तांत्रिक आहे. सर्वसामान्यांच्या आकलनापार आहे. मीही कापसावर कविता लिहिल्या. पण मला कापसाच्या पेरणीपासून मार्केटिंग हा टप्पा, त्यातला बारीक तपशील मराठीत आणल्यास शेतकऱयांच्या अडचणीच्या मुळापर्यंत जाता येईल असे वाटते. आपल्याकडे मध्यस्थ वा अडते आहेत. ते शेतकऱयाचा कापूस त्यांना दिलेल्या कर्जाच्या बदल्यात शेतातूनच उचलतात. कापसाची विक्री करण्यासाठी देशभर मार्केट कमिटय़ा आहेत. तो कमिटीच्या यार्डातच विकला गेल्यास शेतकऱयांना चांगला भाव मिळू शकतो. सीसीआयसारखी संस्था लगेचच त्यांना पैसेही देते. आपला कापूस इतर राज्यात जातो तेथेच त्याचे जिनिंग-प्रेसिंग होते. त्यामुळे प्रलित पद्धतीनुसार त्याची गणना त्या राज्यातल्या उत्पादनात होते. त्याचा महाराष्ट्रातील कापूस उत्पादनावर परिणाम होतो. यात सुधारणा व्हायला हवी. हे सर्व लेखनात येणे आवश्यक वाटले आणि तो कथा कादंबऱयांचा विषयही नाही.
मात्र आपण सर्व समर्थन मूल्य, एमएसपी शब्द ऐकतो. पण ती संकल्पना काय आहे, समर्थन मूल्य कोण ठरवतो, कसे ठरवतात हे ‘कापूस सरकीपासून सुतापर्यंत’ पुस्तकात आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कसे असतात, व्यापार कसा होतो, कोणत्या देशांशी होतो. चायना फॉक्टर काय आहे. आपल्या देशात महिला आणि मुलांना कापसाच्या शेतात कसे राबवून घेतले जाते. जगातले प्रमुख कापूस पिकवणारे, कापसाचा खप असणारे देश कोणते तेथल्या प्रचलित पद्धती हे सर्व विषय पुस्तकात तपशील व आकडेवारीसह विषद केलेले आहेत.
अजय कांडर