काबुल \ ऑनलाईन टीम
अफगाणिस्तानवर तालिबान दहशतवादी संघटनेने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर आता युद्ध संपल्याची घोषणा केली आहे. यामुळे अफगाणिस्तानात तालिबनची सत्ता स्थापन झाली आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलचा ताबा घेतला. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासह उपराष्ट्रपती आणि अन्य राजकारण्यांनी देश सोडला. लाखोंच्या संख्येने नागरिक देश सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे विमानतळ परिसरात देशातून पळ काढण्यासाठी धडपड सुरु आहे. अशातच काबूल विमानतळावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात पाच नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तणावपूर्ण स्थिती पाहता भारतातून अफगाणिस्तानला जाणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तालिबानने अफगाणिस्तानात हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे काबुल आणि दिल्ली दरम्यानची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. भारताकडून एअर इंडियाची काही विमानं एअर लिफ्टसाठी तयार ठेवण्यात आली होती.
काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण थांबवण्यात आले आहे. यामुळे हजारोंच्या संख्येने नागरिक विमानात अडकून बसले आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे नागरिकांना अवघड झाले आहे. या परिस्थितीतीची भीषणता दाखवणारे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काबूल विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर लोक जीव मुठीत घेऊन चालत आहेत. तर वाहनांची मोठी गर्दी झालीय. कसलाही विचार न करता अफगाणी नागरिकांना जीव वाचवण्यासाठी आता देश सोडणे हा एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे दिसत आहे.