जिल्हाधिकाऱयांना भेटायला गेलेच नाहीत, धमकीसह अंतर्गत राजकारणाचेही राजीनाम्यामागे कारण
प्रतिनिधी/ चिपळूण
कामथे उपजिल्हा रूग्णालयाचे राजीनामा दिलेले पाचही डॉक्टर आपापल्या गावाकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे. पावसाचे कारण देत ते जिल्हाधिकाऱयांना भेटायला गेलेच नाहीत, मात्र त्यांच्या राजीनाम्यामागे धमकीसह अंतर्गत राजकारणही कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे पाच डॉक्टर राजीनामा देऊन गेले असतानाच दुसरीकडे अन्य एक डॉक्टर रजा मंजूर नसतानाही मुंबईला गेला आहे.
कामथे रूग्णालयात कोरोनाचे 47 रूग्ण आहेत. तसेच अन्य आजाराचेही रूग्ण येथे उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका कोरोनाबाधितावर उपचार सुरू असताना त्याची प्रकृती ढासळली. यावरून एका राजकीय पक्षाच्या तालुकाप्रमुखाने याचा जाब या 5 डॉक्टरांना विचारत ‘तुम्हाला बघून घेतो, शहरात फिरून दाखवा, तुम्हाला ठारच मारतो’ अशी धमकी दिली. त्याची री इतर पदाधिकाऱयांनीही ओढली. त्यामुळे घाबरलेल्या या परजिल्हय़ातील डॉक्टारांनी अधीक्षक डॉ. अजय सानप यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले, मात्र कोरोनाच्या संकटात त्यांचे राजीनामे महागडे ठरणार असल्याने आमदार शेखर निकम, प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, डॉ. सानप यांनी बैठक घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच तक्रार द्या, संबंधितांवर तत्काळ कारवाई करतो, असे सांगितले. मात्र आम्हाला तक्रार द्यायची नाही, आमचे राजीनामे मंजूर करा, अशी भूमिका या डॉक्टरांनी घेतली. त्यामुळे त्यांना मंगळवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रत्नागिरीत बोलावून घेतले होते. मात्र पावसाचे कारण देत हे डॉक्टर रत्नागिरीत न जाता थेट आपापल्या गावांकडे निघून गेल्याचे वृत्त आहे. त्यांच्या राजीनाम्याला धमकी हे एकमेव कारण नसून अतंर्गत राजकारण व नवीन असल्याने येणारा कामाचा ताण ही कारणेही असल्याचे बोलले जात आहे.
या पाच डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे रूग्णांवर उपचार कसे करावेत, असा प्रश्न प्रशासनासमोर असतानाच दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अधीक्षक पदाचा कार्यभार काढून घेतल्यानंतर डॉ. हंकारे हे रजेचा अर्ज देऊन मुंबईला निघून गेले आहेत. मात्र त्यांची रजा मंजूर करण्यात आली नसल्याचे रूग्णालयाच्या प्रमुखांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आणीबाणीच्या काळात राजीनामे देऊन गावाकडे जाणाऱया 5 डॉक्टरांसह हंकारे यांच्यावरही कारवाई करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.