अध्याय सतरावा
सोळाव्या अध्यायामध्ये उद्धवाने श्रीकृष्णाला विभूती विचारल्या. त्या विचारण्याबाबत उद्धवाचा मुख्य उद्देश असा होता की, भगवंत नक्की कोठे कोठे विभूतिरुपाने असतात हे प्रपंचात रमणाऱया सामान्य माणसाला समजलं की, तो त्यांचं भजन करेल म्हणजे आपोआपच भगवंतांचं भजन त्याच्या हातून घडलं असं होईल. भगवंतांनीही उद्धवाचा उद्देश जाणून विभूतींबद्दल सविस्तर सांगितले. त्या विभूतिवर्णनामध्ये गुह्य गोष्ट अशी सांगितली की, भक्तांचे जे भजनकर्म म्हणून आहे, ते केवळ मीच आत्माराम होय. सात्विकांचे जे कर्म चालत असते, ते कर्म हीच माझी विभूती आहे. आपण होऊन स्वकर्माचे आचरण केले की, ते कर्मच ब्रह्मस्वरूप होते, हे कर्मक्रियेतील वर्म आहे, असे भगवंत म्हणाले. तेव्हा उद्धवाला त्यात एक शंका उत्पन्न झाली की, सतत कर्मे आचरीत असता किती तरी लोक केवळ कर्मठ झाले आहेत त्यांची गणती नाही. अशा करमठ्ठपणातून त्यांना ईश्वरविषयी प्रेम निर्माण होऊन मुक्ती कशी मिळेल? आवडीने कर्मे करीत असताना, आपण आपले कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडत आहोत या विचाराने मनुष्य अभिमानी होतो तेव्हा असा अभिमानी न होता कर्मापासून मोक्षप्राप्ती होईल असा उपाय कोणता असेल अशी शंका उद्धवाच्या मनात आली. त्याचे उत्तर भगवंतानाच विचारावे असे ठरवून, उद्धव त्यांना म्हणाला, तुमच्या आत्मविभूती श्रवण करिताना माझ्या मनात अशी शंका आली की, स्वधर्माने भक्ती कशी घडेल ?
तू तर कल्पाच्या आदीपासूनच मोठय़ा कळकळीने सांगत आला आहेस की, स्वधर्मकर्मानेच भक्ती प्राप्त होते आणि त्याकरिताच वर्णाश्रम कसकसे आहेत ह्यांचे उत्कृष्ट प्रतिपादन तू केले आहेस. सर्व मनुष्यांना उत्तम गती आणि भगवद्भक्ती ही स्वधर्मानेच प्राप्त होतात, असे तूच यथार्थ व निश्चित निरूपण केले आहेस. हे कमलनयना अच्युता ! ऐक, जो स्वधर्म आचरण केला असता तुझी भक्ती स्वभावतःच भक्तांच्या हाती लागते त्या कर्मकौशल्याचे लक्षण, हे कमलनयना ! माधवा ! कृपामूर्ते ! मला ठामपणे सांगावे. पूर्वी (तेराव्या अध्यायात) हंसरूपाने स्वधर्माचा निश्चित विचार तू सविस्तर सांगितलास आणि त्यातलेच अध्यात्मज्ञानाचे रहस्य निवडून मला उत्तम प्रकारे सांगितलेस परंतु तू हंसरूपाने आपण होऊन जो स्वधर्म सांगितलास, त्यातील स्वधर्माचे लक्षण व त्याचे निरूपण मला समजले नाही. याकरिता सनत्कुमारांना जो आश्रमधर्म तू ऐकवलास, तोच मला सांग. आता कदाचित तू म्हणशील की, सनत्कुमारांच्या द्वारेच परंपरेने धर्माचा प्रसार झालेला आहे, त्याचाच विचार करून त्यातील रहस्य जाण म्हणजे झाले. परंतु श्रीकृष्णा ! तसे मजकडून व्हावयाचे नाही. याला कारणही तसेच आहे ते मी तुला सविस्तर सांगतो.
काम, क्रोध, लोभ, अभिमान इत्यादि षडरिपू हेच भक्तांचे मोठे वैरी आहेत, तू त्यांचा संहार करतोस, म्हणूनच तुला ‘अरिमर्दन’ असे म्हणतात. भक्तांच्या शत्रूचा नाश करणारा तुझ्यावाचून त्रिभुवनात दुसरा कोणीच नाही म्हणून तुला मी अनन्य भावाने शरण आलो आहे. कल्पाच्या प्रारंभी तू सनकादिकांना उपदेश केलास, त्या उपदेशाला फार काळ लोटून गेल्यामुळे तो धर्म आता बहुतकरून कोणापाशी राहिला नाही. सध्याच्या काळात बहुतेक लोक स्वधर्मामध्ये तत्पर नसतात. लोक स्वधर्माचा विचार विसरून जाऊन कामासक्ती व उदरपूर्ती यातच लुब्ध झाले आहेत.
यामुळे यथार्थ धर्म अंतःकरणांत बिंबवील असा उपदेशकच कोणी उरलेला नाही. म्हणून हे वैकुंठाधिपते ! मला स्वधर्माची नि÷ा तूच सांग. हे अच्युता ! ब्रह्मदेवाच्या सभेत वेदादिक कला मूर्तिमंत होऊन विराजमान असतात, तेथे सुद्धा आपल्याखेरीज दुसरा कोणीही, आपला हा धर्म तयार करणारा, तो सांगणारा व त्याचे रक्षण करणारा नाही मग पृथ्वीवर कसा असेल ? आता तर तुम्ही निजधामाला निघालात. हे मधुसूदना ! या धर्माचे प्रवर्तक, रक्षण करणारे आणि उपदेशक असे आपणच पृथ्वीवरून निघून गेल्यावर हा लुप्त धर्म कोण सांगेल ?