प्रतिनिधी/ कारवार
जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर व भटकळ या पाच तालुक्यातील 101 ग्राम पंचायतीची निवडणूक मंगळवारी काही घटनांचा अपवाद वगळता शांततेत पार पडली. किनारपट्टीवरील पाच तालुक्यातील सरासरी 74.75 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. कारवार तालुक्यात 71.22 टक्के, अंकोला तालुक्यात 75.84 टक्के, कुमठा 75.30 होन्नावर 75.83 आणि भटकळ तालुक्यात 75.63 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या आकडेवारीमध्ये (अंतिम) काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.
किनारपट्टीवरील काही ठिकाणी मतदान अतिउत्साहाने तर अन्य काही ठिकाणी निराशाजनक वातावरणात पार पडले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाच्या पहिल्या दोन तासात किनारपट्टीवरील तालुक्यात सरासरी 10.88 टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये कारवार तालुक्यातील 8.78 टक्के, अंकोला तालुक्यातील 8.96, कुमठा 10.82, होन्नावर 11.48 व भटकळ तालुक्यातील 10.6 टक्के मतदानाचा समावेश होता दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी मतदानाची टक्केवारी 55.77 इतरी राहिली. यामध्ये कारवार तालुक्यातील 52.54 टक्के इतरी राहिली. यामध्ये कारवार तालुक्यातील 52.54, अंकोला 56.99 टक्के, कुमठा 55.70, होन्नावर 55.64 आणि भटकळ तालुक्यातील 55.29 टक्के मतदानाचा समावेश होता. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाले. हे खरे असले तरी काही वेळ मतदार मतदान केंद्राकडे फिरकले नाहीत. तथापि, मतदान केंद्राबाहेर उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. 9 वाजल्यानंतर मतदानाने वेग धरला. तथापि हा वेग बारा-साडेबारा वाजेपर्यंत टिकून राहिला आणि नंतर तापमानाचा पारा वाढल्याने मतदारांनी घरीच राहणे पसंद केले. सूर्य पश्चिमेकडे झुकऱयानंतर मतदार पुन्हा घराबाहेर पडले त्यामुळे जसजशी मतदानाची वेळ संपत आली तशी मतदारांनी मतदार केंद्रावर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
मतदार यादीत नावे नसल्याने तक्रार
कुमठा तालुक्यातील देवगिरी ग्राम पंचायतीच्या मठ वॉर्डमधील मतदारांची नावे गायब झाली होती. मठ वॉर्ड ऐवजी मतदारांची नावे कडेकोडी हरबीर वॉर्डमध्ये आढळून आली. त्यामुळे मठ वॉर्डमधील मतदारांनी व उमेदवारांनी सरकारी अधिकाऱयांच्या या गलथान कारभाराच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
आमदार रुपाली नाईक यांनी चंडिया येथे केले मतदान
कारवार-अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांनी कारवार तालुक्यातील चंडिया येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानानंतर त्यांनी सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. कारवारचे आमदार सतीश सैल यांनी माजाळी येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी चढाओढ
दरम्यान, मतदार राजाला मतदान केंद्रावर आणण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून आले. मतदारांना आणण्यासाठी मोटारसायकली, रिक्षा, चारचाकी वाहनांचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला. त्यामुळे काही रिक्षाचालकांसाठी आजचा दिवस सुगीचा ठरल्याचे सांगण्यात आले.
1264 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
किनारपट्टीवरील एकूण 1264 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. भवितव्य बंद झालेल्या उमेदवारांमध्ये वकील, प्राध्यापक, माजी सैनिक, उद्योजक, पत्रकार, निवृत्त मुख्याध्यापक, माजी तालुका पंचायत अध्यक्ष, विद्यमान तालुका पंचायत सदस्य, माजी जि. पं. सदस्य आदींचा समावेश आहे. मतमोजणी 30 डिसेंबर रोजी होणार असून आता सर्वांची नजर 30 तारखेकडे लागून राहिली आहे.
असनोटी येथे निवडणूक प्रक्रियेबद्दल वरिष्ठाडे तक्रार
कारवार तालुक्यातील असनोटी ग्राम पंचायतीच्या वॉर्ड क्र. 1 (मधेवाडा) मधील चार जागांसाठी चुरशीची लढत जुंपली होती. एका पॅनेलचे नेतृत्व उमेदवार अरुणकुमार साळुंके करीत होते. अरुणकुमार राष्ट्रीय आदर्श पुरस्कार विजेते तर संजय साळुंके पेशाने वकील. परिणामी या लढतीबदल कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. अरुणकुमार भाजपचे तर संजय काँग्रेसचे समर्थक. त्यामुळे या लढतीला अप्रत्यक्षरित्या का होईना राजकीय स्वरुप प्राप्त झाले होते. मतदान सुरु असताना मतदान केंद्रात दाखल झालेल्या मतदारांच्याकडे असलेल्या क्रमांक चिठ्ठीच्या पाठीमागील बाजुस विरोधी पॅनेलमधील उमेदवारांची चिन्हे छापण्यात आल्याचे अरुणकुमार साळुंके यांना दिसून आले. याबद्दल अरुणकुमार यांनी आक्षेप घेतला आणि निवडणूक कर्मचाऱयांना मतदान बंद पाडण्यास भाग पाडले. एवढय़ावर समाधान न झालेल्या अरुणकुमार यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. तातडीने कारवारचे तहसीलदार जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यदर्शी मतदान केंद्रावर दाखल झाल्या आणि पाहणी केली.
निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
यावेळी पत्रकारांशी बोलताना अरुणकुमार म्हणाले, ही घटना नजरेला येईपर्यंत 1300 पैकी 253 मतदारांनी मतदान केले होते. या प्रकरणाची संबंधितांनी गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे. संबंधित निवडणूक कर्मचाऱयांवर कारवाई केली. पाहिजे. या घटनेच्या विरोधात आम्ही रितसर तक्रार दाखल करणार आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही. तर भाविष्यात आम्ही ग्रा. पं.ला टाळे ठोकण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा पुढे त्यांनी दिला.
याबद्दल बोलताना विरोधी पॅनेलचे संजय साळुंके म्हणाले, आपल्या विरोधकांना पराभव दिसत असल्यामुळे ते असे वागत आहेत. पॅनेलच्या पाठीमागे भाजपचे कुटिल राजकारण पडले आहे.