महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला कृष्ण कथा सांगताना पुढे म्हणतात – रुक्मीने असा अपमान केल्यामुळे बलरामांनी क्रोधाने एका लोखंडी काटे लावलेल्या सोटय़ाने त्या विवाह मंगल सभेतच रुक्मीला ठार केले.
मंगळसभामध्यवर्ती । रुक्मी झोडूनि पाडिला क्षिती ।
अपर राजे प्रतापमूर्ती । पळती दिगंतीं प्राणभयें ।
पदविन्यास क्रमिले नव । दशमे पदीं कालिङ्गराव ।
धरूनि हृदयीं दिधला पाव । मग केला अभाव दशनांचा । सभास्थानीं हेलनायुक्त । कालिङ्ग हांसिला विचकूनि दांत । ते बळरामें हाणौनि लाथ। पाडिले समस्त चौकीचे । लत्ताप्रहारें पाडिले दशन । रुधिर प्रवाहे मुखामधून । कालिङ्ग तळमळी जैसा मीन । पावतां पतन उष्ण पुलिनीं ।
जो कलिंगनरेश अगोदर दात विचकावून हसत होता, तो आता तेथून निसटला, परंतु बलरामांनी दहा पावलांवरच त्याला गाठून क्रोधाने त्याचे दात पाडून टाकले.
राजे जे जे नामाविलें । शस्त्रास्त्रेसीं सज्ज झाले ।
परिघें बळरामें ठोकिले । तें तूं वहिलें अवधारिं ।
कालिङ्गाचे पाडिले दांत । कितिएकांचे मोडिले हात। लागतां कठोर परिघघात । बाहु चूर्णित अस्थीसीं । मोडल्या एकांच्या मांडिया । गुडघे घोंटी पोटरिया । कटी एकांच्या भंगलिया । कुक्षि वक्षें कंठ शिरें । उभ्या रक्तें नाहले वीर । शस्त्रास्त्रांचे पडिले विसर । एक पळाले सत्वर । पलायन शूरधीरांचें ।
बळभद्राच्या परिघमार । कोणी सांवरूं न शके वीर ।
एक म्हणती आम्ही किंकर । न कीजे निकर क्रीडेचा। सेवकीं राजे परिघक्षतीं । वळखूनि घातले रथीं । आपुलाल्या नगरा नेती । जाली समाप्ति सोहळिया । रुक्मिणीचिया स्वयंवरिं । बळराम कळला असतां समरिं । पुढती द्यूतसभागारिं । कां पां नृपवरिं तो छळिला ।
बलरामांनी त्याच सोटय़ाने दुसऱया राजांचेही हात, मांडय़ा, मस्तके इत्यादी तोडून टाकली. रुक्ताने माखलेले ते भयभीत होऊन तेथून पळू लागले.
केलें तैसें पावलें फळ । रुक्मि वधिला विदर्भपाळ ।
आपुलाल्या नगरा सकळ । गेले भूपाळ भग्नाङ्गीं ।
एकीं ओढूनि बांधिलें शिर । एकीं गळां घातले कर ।
यष्टिकापीठीं देऊनि भार । एकां संचार पदभग्नां ।
लोकविद्विष्ट सौहार्द केलें। त्याचें तैसेंचि फळही घडलें। तस्माच्छास्त्रें निषेधिलें । तें आचरिलें न पाहिजे । रुक्मि मेला विदर्भपति । वनिता पुत्र प्रधान रुदती। यानें सज्जूनि वातगति । द्वारके निघती बाळकृष्ण । सोहळय़ामाजी झालें विघ्न । मृत्युपंचकीं होतें लग्न ।
एक म्हणती कुलाचरण । दैवविधान विसरले ।
एक म्हणती होणार न टळे । लाभ विजय जैसा सुवेळे । हानि मृत्यु काळवेळे । आपुल्या फळे फळदानीं । द्यूतक्रीडेचें करूनि मिष । दैवें केला बुद्धिभ्रंश । निमित्त देऊनि बळरामास । काळें भूपास ग्रासिलें ।
कित्येक जखमी झालेल्या राजांना त्यांच्या सेवकांनी रथात घातले व आपल्या राज्यांकडे पळ काढला. वास्तविक रुक्मिणी हरणाच्या वेळीच बलरामाचा पराक्रम या राजांनी पाहिला होता. तरीही हे द्यूत प्रकरण त्यांनी का काढावे?
ऍड. देवदत्त परुळेकर