गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी / सरवडे
मेघोली धरण फुटीमुळे काळम्मावाडीची अनेक वर्षे सुरू असलेली धरण गळती चर्चेत आली आहे. सद्यस्थितीत धरण शंभर टक्के भरले असून धरणातून परसेकंद १९१ लिटर पाण्याची गळती सुरू असून या पार्श्र्वभूमीवर पाटबंधारे विभागातील अधिक्षक अभियंता यांच्या पथकाने धरण क्षेत्राला भेट देऊन पहाणी केली. याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तातडीने गळती थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याचे या पथकाने सांगितले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा जलाशय म्हणून काळम्मावाडी धरणाकडे पाहिले जाते. या पाण्यावर जिल्हासह कर्नाटकातील सीमाभागातील शेती व लोकांची तहान भागवली जाते. पण सध्या या धरणाला गळतीचे ग्रहण लागल्यामुळे धरणाचा मजबुतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दुधगंगा नदिकाठावरील जनतेमध्ये धरणाचा मजबुतीविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.
काळम्मावाडी धरण हे ६४६.०० मीटर ( २५.४० टीएमसी ) पाणीसाठा क्षमता असलेला प्रकल्प असून या धरणाचा बांधकामास सन १९७७ साली सुरुवात झाली आहे तब्बल बावीस वर्षानी म्हणजे १९९९ साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले असून दुसर्याच वर्षी म्हणजे २००० साली याधरणातून परसेकंद ७० लिटर नैसर्गिक गळती मान्य असताना ३९८ लिटर परसेकंद गळती सुरु झाली होती पण ग्राउटिंग करुन ही गळती काही प्रमाणात कमी करण्यास यश मिळाले असून ही गळती सतत कमी-अधिक झालेली दिसून येते.
मेघोली धरणफुटीचा आठवणी ताज्या असताना दुधगंगा नदिकाठावरील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी यागळतीविषयी त्वरीत पाटबंधारे विभागाने गळती कमी करण्यासाठी पाऊले उचलून धरण मजबुतीकरणावर भर द्यावा अशी मागणी या पंचक्रोशीतील जनतेने केली आहे. या पहाणी पथकात अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, अमोल नाईक, सहाय्यक अभियंता भाग्यश्री पाटील, कल्याणी कालेकर,कनिष्ठ अभियंता अंजली कारेकर, अमोल गोधडे कर्मचारी महादेव सावंत,यशवंत पाटील, प्रकाश रेवडेकर,अशोक जाधव, शामराव शिंदे, अनिल चौगले, ज्ञानदेव राणे सहभागी होते.
तरुण भारतचे सर्व प्रथम वृत्त
भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील धरण आकस्मिक फुटल्याने मोठे नुकसान झाले. या धरणाच्या फुटीमुळे काळम्मावाडी धरणाची गळती चर्चेत आली. या गळतीवर उपाय योजना केली असली तरीही गळती सुरू असल्याने दूधगंगा नदीकाठच्या लोकांमध्ये घबराट असल्याचे जाणवू लागली. ‘गळती रोखण्यासाठी उपाय योजनांची गरज’ या आशयाखाली दै तरुण भारतने २८ सप्टेंबर च्या अंकात छायाचित्रासह वृत सर्वप्रथम प्रसिद्ध केले. याबाबत शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अजित पोवार यांनी उपाय योजना करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज पाटबंधारे विभागाने आज धरणाच्या गळतीची पाहणी केली.