कोळसे तयार करणाऱ्या आदिवासी जमातीची अनोखी कहानी….
शरद माने / वाळवा
एका बाजूला कोरोनाशी जग संघर्ष करीत आहे. प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण सापडत असतानाही काही मोजकी कुटुंबे बाभळीच्या बनात राबत आहेत. अशा अनेक कुटूंबांपैकीच काही कुटुंबे वाळवा-इस्लामपूर रस्त्याला ओढ्याच्या आश्रयाला राहत आहेत. सखाराम वाघमारे, जयराम वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे, देवाप्पा पवार काही कुटुंब या परिसरात राहत आहेत. सर्व मिळून लहान मुलांच्यासह १० ते १५ व्यक्ती या कोळसा निर्मितीतून स्वतःचा चरितार्थ चालवत आहेत. ते मूळचे रायगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कै. देवराम मालू पवार या त्यांच्या पूर्वजांनी या व्यवसायाला सुरुवात करून दिली. हा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. कोळसा तयार करायचा व विकायचा व्यवसाय सध्या तिसरी पिढी चालवताना दिसत आहे.
हे मूळचे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रहिवासी. कै. देवराम मालू पवार या त्यांच्या पूर्वजांनी या व्यवसायाला सुरुवात करून दिली. हा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. कोळसा तयार करायचा व विकायचा व्यवसाय सध्या तिसरी पिढी चालवताना दिसत आहे. वाळवा तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये ओढ्यालगत क्षारपड जमिनी आहेत. या जमिनीमध्ये बाभळींची वने तयार झालेली आहेत. त्या बाभळीची छोटी छोटी वनेच आता या कुटुंबांचा जगण्याचा आधार ठरत आहेत.
शासनाने त्यांची रेशन कार्ड सुद्धा बंद केल्यामुळे सध्या दुकानातून मिळणाऱ्या विकतच्या अन्न धान्यावर ते जगताना दिसत आहेत. आम्ही आदिवासी आहोत असे ते स्वतः सांगतात. परंतु, शासनाशी भांडत बसायला त्यांना वेळ नाही. त्यांना बाहेरचा तेवढा अनुभवही नाही. त्यांच्या जवळ जो आहे तो फक्त पोटा पाण्याचा प्रश्न. त्यांनी तयार केलेला कोळसा ढाबेवाल्यांना रोटी तयार करण्यासाठी लागतो. त्यासाठी कोळशाची मोठी मागणी आहे. तसेच इस्त्रीवाले, हॉटेलवाले यांना देखील कोळसा लागत असतो. अनेक गेस्ट हाऊसवर चुलीवरचं जेवण करण्याची फॅशन आहे. तेथे देखील कोळसा लागतो. त्यांच्या या तयार केलेल्या कोळशाला मुंबई, पुण्यातदेखील मोठ्या प्रमाणावर मागणी असते. दोन तीन कुटूंबांमागे महिन्याला शंभर पोती किंवा त्यापेक्षा जास्त कोळसा हे लोक तयार करतात.
…..म्हणून आम्ही आमचं गाव सोडल
कोळसा करणारे जयराम पवार म्हणाले, आमच्या गावाकडे आम्ही गणपती उत्सव आणि दसरा या दोन्ही वेळेला जातो. पावसाळ्यात आमचा धंदा पूर्णपणे बंद असतो. आमचं गाव सोडून जिथे मिळेल त्या ठिकाणी जाऊन आम्ही झाडे तोडतो. आम्ही गावाकडे फक्त म्हातारी माणसं ठेवत असतो. त्यांचा चरितार्थही आम्ही इथून चालवत असतो. गावाकडे आम्हाला १०-१५ एकर प्रत्येक कुटूंबाला शेती आहे. पण ती पावसाळ्यात फक्त फूलते. त्यामुळे आमच्या या शेतीचा आम्हाला काहीच फायदा नाही. संपूर्ण भाग डोंगराळ असल्याने तेथे पाइपलाइन करता येत नाही त्यामुळे शेती केवळ पावसाच्या पाण्यावरच पिकू शकते त्यामुळे आम्ही आमच गाव, शेती सगळ सोडून असे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.