कालच मराठी रंगभूमी दिन साजरा झाला. इ.स.1843 मध्ये पहिले मराठी नाटक आले, ते म्हणजे विष्णुदास भावे यांचे ’सीतास्वयंवर’! त्याचीही एक गंमत आहे. विष्णुदास भावे हे सांगलीचे. सांगलीच्याच पटवर्धन महाराजांच्या प्रोत्साहनामुळे आणि प्रेरणेमुळे विष्णुदास भावेंनी हे नाटक रंगभूमीवर आणले. ह्या नाटकाची कल्पना त्यांना कर्नाटकमधील लोककला ’यक्षगान’ वरून सुचली. खरंतर हे पौराणिक नाटक. पण त्याला लिखित संहिता नव्हती, संवाद नव्हते, कथानक सामाजिक नव्हते. ह्या पौराणिक नाटकात एक एक पात्र येईल तशी सूत्रधार त्याची ओळख करून देई आणि गाण्यातून गोष्ट सांगे. ती पात्रे हावभावातून स्वतःचे संवाद प्रेक्षकांपर्यंत पोचवत. तरीही हे नाटक अगदी त्या काळात तिकीट लावून रंगमंचावर प्रेक्षकांसाठी सादर केले जात असे. संगीत नाटकाची सुरुवात नेहमी नांदीने म्हणजे मंगलाचरणाने होत असे. अर्थातच ही पद्धत मूळ संस्कृत नाटकावरून मराठीत घेतली गेली. नद्यन्ते इति नांदी। अशी तिची व्युत्पत्ती आहे. म्हणजे लोकांना जी आनंद देते ती नांदी! नुकतीच एक आधुनिक नांदी वाचनात आली त्यात संस्कृत भाषेचे वर्णन केले आहे. विश्वारम्भे सुरैर्निर्मिता नियतं सुदीप्यमाना।जयति भास्वती संस्कृतवाणी मनसि विराजमाना।।त्या राजते सभा सुललिता स-कला स-रसा रमल्या। स्तुम: सदा तां सभां संस्कृतं भविता सा जनमान्या।। जी विश्वाच्या आरंभी देवांनीच निर्माण केलेली आहे, अशी ती ओजस्वी संस्कृत भाषा सर्वांच्या मनात विराजमान झाली आहे. जिच्यात लालित्य आहे, जी सर्व कला आणि रसांनी युक्त आहे, अशा तिच्यामुळे ही सुसंस्कृत(भाषेसंबंधीची) सभा शोभून दिसते. ती जनमान्य होण्यासाठी, तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्ही तिचे स्तवन करतो!
प्राचीन संस्कृत नाटकात अशा प्रकारचे आशीर्वादात्मक श्लोक वा पद्य नाटक सुरू करण्यापूर्वी सूत्रधार म्हणत असे, तेच मंगलाचरण होय. विघ्नशांती होण्यासाठी ते गायले जाते. ती आठ ते बारा चरणांची लिहिलेली असे. संस्कृत नाटय़परंपरेनुसार नाटक हेही एक काव्यच मानले जात असे. त्याला दृश्यकाव्यही म्हणतात. काव्येषु नाटकं रम्यम्। असे त्याचे वैशिष्टय़ सांगितले आहे. कारण काव्याप्रमाणेच नाटक अनेक भाव, अवस्था,? रस, विविध प्रकारचे हावभाव, अभिनय इ. द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करते. त्यात आस्वादन आणि संप्रेषणाची क्रिया एकाच वेळी चालते. आचार्य भरतमुनींच्या म्हणण्यानुसार असे कोणतेही ज्ञान, शिल्प, विद्या, योग किंवा कर्म नाही, जे नाटकात दिसत नाही. न तज्ञानं न तच्छिल्पं न सा विद्या न सा कला। न स योगो न तत्कर्मं नाटय़े अस्मिन् यन्न दृश्यते।। म्हणूनच भरतमुनींनी नाटकाला पञ्चमवेद असे म्हटले आहे. ते किती खरे आहे!