ऑनलाईन टीम / तरुण भारत
जम्मु – काश्मिरमध्ये दहशतवादी आणि संरक्षण दले यांच्यातील चकमक ही धुसफूस भारत स्वतंत्र झाल्यापासुन आजपर्यंत सुरुच आहे. पाकिस्तानला स्पष्टपणे भारताशी युद्ध करु शकत नसल्याने छुप्या पद्धतीने हल्ले करणे हेच धोरण पाकिस्तानने आजपर्यंत स्विकारलेले आहे. याच पार्श्वभुमीवर श्रीनगरच्या नौगाम परिसरात बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षादलांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले. जम्मु-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ठार झालेले तिन्हीही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाशी संबंधीत होते. त्यांच्याजवळ अनेक धोकादायक विस्फोटक, हत्यार आणि आपत्तिजनक साहित्य होते, ते जप्त करण्यात आले आहे. सर्च ऑपरेशन अद्याप सुरु आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. जोन पोलिसांचे IG विजय कुमार यांनी सांगितले की, खानमोहचे सरपंच समीर भट्ट यांच्या हत्येत सामिल दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे 3 दहशतवादी मारले गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये 23 वर्षांचा शाकिब मुश्ताक खान हा श्रीनगरच्या खानमोह येथे राहणारा होता.
तसेच इतर दोन दहशतवादी आदिल नबी तेली (23 वर्षे) आणि उमेर नबी तेली (25 वर्षे) पंपोर येथील राहणार आहेत. यावेऴी IG विजय कुमार म्हणाले की, पुलवामा चकमकीत जैशचा एक कमांडर देखील मारला गेला होता. जो 2018 पासून पुलवामा-शोपियां परिसरात अॅक्टिव्ह होता आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामिल होता.