-जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन -जिहादींचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
काश्मीर घाटी मध्ये घडलेल्या हिंदूंच्या नृशंस हत्येचा निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात शहरातील संघटनाही सहभागी झाल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतीना निवेदन पाठवले आहे. जिहादींचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,. काश्मीर घाटीत 5 दिवसात सात भारतीयांच्या हत्या झाल्या आहेत. नवरात्रीच्या काळात एका शिख महिला शिक्षिकेची हत्या यावर तीव्र चिंता व आक्रोश व्यक्त होत आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. जिहादी आतंकवादाचा पूर्णत: विनाश करण्याकरिता पाकिस्तानला न भूतो न भविष्यती असे उत्तर द्यावे. तसेच हिंदुंना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित करुन त्यांना स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था सुनिश्चित करावी. हिंदूंच्या काश्मीर घाटीत पुनर्स्थापने शिवाय आतंकवादावर लगाम लावणे अशक्य आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
हिंदूंच्या सातत्याने होत असलेल्या नृशंस हत्येमुळे हिंदू संघटना आक्रमक आहेत. बजरंग दलाचे कार्यकर्ते देशभरात जिहादी आतंकवादा विरुद्ध तीव्र प्रदर्शन करीत आहेत. भारताच्या पावन भूमीला रक्तरंजीत करण्याचा प्रयत्न करणाऱया, भारतभूमीच्या अखंडत्वाला बाधा पोहचवून तिचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱयांना कडक शिक्षा करण्यात यावी. भारताच्या एकतेसाठी व अखंडत्वासाठी संपूर्ण देश कृतसंकल्प आहे. जिहादी आतंकवादाला जशास तसे उत्तर देणे आम्ही योग्य पद्धतीने जाणतो. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा एक-एक कार्यकर्ता यासाठी तत्पर आहे. आतंकवादाचा राजनैतिक शस्त्र म्हणून प्रयोग करणाऱया जिहादी पाकिस्तानवर अंकुश लावण्याकरिता विश्व समुदायाने पुढे यावे, असे आवाहन निवेदनात केले आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गावाहिनी संघटनेच्यावतीने हे निवेदन देण्यात आले आहे.