वार्ताहर / झुआरीनगर
कुठ्ठाळी मतदारसंघातील कासावली भागातही कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने कासावली आरोसी कुएली तसेच सांकवाळ पंचायतीने लॉकडाऊन जाहीर केला आहे. मंगळवारी सरपंच जुझे मारियो फुर्तादो तसेच सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांच्या अध्यक्षतेखालील पंचायत मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
कासावलीच्या बैठकीला पंच सदस्य फेरविन साल्ढाणा, रत्नदीप नाईक व ईशा नाईक तसेच नागरिक उपस्थित होते. कारोना बाधितांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे. गुरूवार दि. 6 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार हे लॉकडाऊन 12 तारखेपर्यंत असणार आहे. यावेळी सकाळी 6 ते 11.30 पर्यंत दुकाने खुली असणार असे सरपंच जुझे फुर्तादो यांनी सांगितले.
सध्या कोविड रूग्णांची परवड होत आहे. कासावलीतील क्रीडा संकुलाची इमारत, प्राथमिक शाळेची जागा रूग्णाच्या आरोग्य सुविधासाठी उपयोगी होऊ शकतात तसेच पंचायतीचे सभागृहात लसीकरासाठी सोय होऊ शकते असे सरपंचानी सांगितले. या लॉकडाऊन काळात सर्वांचे सहकार्य खूप महत्वाचे आहे. वाढत्या संसर्गामुळे हे लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. आपण सर्वानी स्वतःहून बाहेर न पडता हा लॉकडाऊन यशस्वी करण्याची आवश्यकता असल्याचे पंच सदस्य रत्नदीप नाईक यांनी सांगितले.
सांकवाळ पंचायतीने घेतला लॉकडाऊनचा निर्णय
कुठ्ठाळी तसेच वेर्णा पंचायतीपाठोपाठ आता सांकवाळ पंचायतीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. सरपंच रमाकांत बोरकर यांनी बोलाविलेल्या खास बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसरपंच सोकोरिना वालीस, पंच सदस्य नारायण नाईक, गोविंद लमाणी, सतीश पडवळकर, गिरीष पिल्ले, सुनीता बोरकर व आरिष कादर उपस्थित होते. कोरोना बाधितांची ही साखळी तोडण्यासाठी अनेक पंचायतीने लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे. सांकवाळ भागातही अनेक कुटुंबात कोरोनाची बाधा झालेली आहे.
लोकांत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तेव्हा आपण सर्व पंच सदस्यांना विश्वासात घेऊन दि. 5 ते 11 पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याचे सरपंच रमाकांत बोरकर यांनी सांगितले. सांकवाळ पंचायत क्षेत्रातील दुकाने सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत खुली राहणार तसेच पंचायतीचे कार्यालयही सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत कार्यरत असणार आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरोग्य संचालकांच्या निर्णयाविरूद्ध आम्ही नाही. परंतु सध्या गावात काय चाललेले आहे याची कल्पना आपल्याला आहे. आणि हा जो लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे. तो गाव व गावातील लोकांच्या भल्यासाठीच आहे असे सरपंच बोरकर यांनी सांगितले.