देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात गेल्या 4-8 दिवसात ज्या घटना, घडामोडी घडल्या, घडत आहेत त्या पाहता काहीतरी शिजत आहे. राजकारण कूस बदलण्याचा प्रयत्न करत आहे हे कुणाच्याही लक्षात येईल. श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यव्यापी दौरा व भेटीगाठी सुरु केल्या आहेत ते शरद पवारांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत अनेकांना भेटले. तसे प्रकाश आंबेडकर यांनाही भेटले. या भेटीची चर्चा आणि वृत्त जे समोर आले आहे त्यानुसार फुले-शाहू-आंबडेकर यांचे वारसदार यांनी एकत्र यायचे अर्थात संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ यांनी एकत्र यायचे आणि राजकारणात जे साचलेपण आले आहे ते दूर करत नवा पक्ष, नवी आघाडी आकाराला आणायची अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. तसे झाले तर फुले-शाहू-आंबडेकर यांचे नाव घेत आपली राजकीय दुकानदारी चालवणारे नेते व पक्ष अडचणीत येणार हे उघड आहे. पण हे होणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यात असे काही सुरु असताना दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आरक्षणासह निधीपर्यंत राज्यापुढील अनेक प्रश्नांची चर्चा केली. पण ही चर्चा झाल्यावर उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी यांची सुमारे अर्धा तास बंद खोलीत स्वतंत्र चर्चा झाली आणि या गुफ्तगूचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मोदींसोबत आपले नाते टिकून आहे’ असे म्हटले आणि त्यामुळे राज्यात नवी चर्चा सुरु झाली. मोदी-ठाकरे भेटीवर देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक प्रतिक्रिया आली आणि या चर्चेला बहर आला. या भेटीने व चर्चेने राज्यातील तीन पक्षांचे सरकार अडचणीत येणार काय असे चित्र निर्माण झाले. राज्यपातळीवर असे काही सुरु असताना तिकडे रा. स्व. संघाने बंगालमधील भाजपाला सत्ता प्राप्तीत आलेले अपयश, मोदींचे नेतृत्व व आगामी उत्तर प्रदेश, गोवा आदी सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका व सन 2024 ची लोकसभा निवडणूक या संदर्भात चिंतन बैठक घेतली. या बैठकीचे निष्कर्ष व धोरणात्मक निर्णय अद्याप पुढे आलेले नाहीत. पण बंगालमध्ये भाजपाचा प्रादेशिक नेता विरुद्ध ममता अशी लढाई झाली नाही. हे अपयशाचे कारण पुढे आले व इथून पुढे विधानसभा निवडणुकीत स्थानिक नेत्याला महत्त्व देऊन लढवावी असे धोरणात्मक ठरले. ओघानेच योगी आदित्यनाथ वगैरेंचे महत्त्व वाढणार हे स्पष्ट झाले. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात आगामी निवडणुका व राजकीय समतोल यांचा विचार स्वाभाविक आहे. काहींना डच्चू तर मुंबई महापालिकेसह आगामी निवडणुका लक्षात घेऊन काहींना संधी दिली जाणार आहे. मोदींच्या व रा. स्व. संघाच्या मनात काय आहे याचा कुणालाच अंदाज नाही. पण तेथेही काही शिजते आहे. भाजपाच्या व नरेंद्र मोदींच्या पातळीवर मंत्रिमंडळ विस्तार आणि निवडणूक रणनीतीत बदलाच्या हालचाली सुरु असताना भाजपाचा काँग्रेसला पोखरण्याचा उद्योग थांबलेला नाही. काँग्रेसचे सचिन पायलट यांनी पुन्हा आपली नाराजी व्यक्त करत काँग्रेसपुढे आव्हान उभे केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये जतीन प्रसाद यांनी तर भाजपा प्रवेश करुन काँग्रेसला धक्का दिला आहे. मात्र बंगालमध्ये भाजपा सत्ता मिळवू शकली नाही. या पार्श्वभूमीवर तेथे मुकुल रॉय यांची घरवापसी झाली आहे. आणखी काही त्या वाटेवर आहेत. ममतादीदींनी भाजपाला बंगालमध्ये धक्का दिला आहे. राष्ट्रीय राजकारणात अशा महत्त्वाच्या घटना, घडामोडी होत असतानाच शरद पवार यांनी मुंबईत आपल्या निवासस्थानी रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत 3 तास खलबते केली. पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच रौप्यमहोत्सव साजरा करणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पवार कन्या सुप्रिया सुळे व देशाच्या सर्वोच्च पदावर शरद पवारांना विराजमान व्हायचे आहे. त्यासाठीच राज्यात नवा प्रयोग करत भाजपाला रोखले. आता हाच प्रयोग त्यांना देशात करायचा आहे. पण पवारांचा मनसुबा त्यांना अडचणीचा ठरु शकतो. राष्ट्रवादीत जयंत पाटील, अजितदादा असे अनेकजण मुख्यमंत्रीपदावर नजर ठेवून आहेत. शरद पवारांनी भाजप-शिवसेनेची युती मोडीत काढली. त्यांना आता भाजपात फूट पाडायची इच्छा असली तर ती राजकारण म्हणून ठीक आहे. या इच्छेतून नितीन गडकरींना राष्ट्रवादीकडून सतत चुचकारले जाते आहे. पण नितीन गडकरी कच्च्या गुरुचे चेले नाहीत. या साऱया राजकीय खेळीत काँग्रेस कुठेही दिसत नसली तरी काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा, रणनीती सुरू आहे. काँग्रेस पवारांच्या नादी लागून राष्ट्रीय पातळीवर भाजपा विरोधी आघाडीत दुय्यम स्थान आणि पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मान्यता देण्याची सुतराम शक्यता नाही. सोनिया गांधींना आपले सुपुत्र राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे. काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला सोबत घेईल असे आज तरी वाटत नाही पण राजकारणात कोण कुणाचा कधी मित्र अथवा शत्रू होईल सांगता येत नाही. शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई महापालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेना महाआघाडी म्हणून लढणार का हा प्रश्न आहे. राजकीय पंडितांना या साऱया राजकीय हालचालीत महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीचा संशय येतो आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस मुंबई महापालिका व आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असे म्हटले आहे. शरद पवार यांची भूमिका जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा काँग्रेस काय निर्णय घेते हे बघावे लागेल. त्याचबरोबर उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांचे टिकून असलेले नाते कसे व्यक्त होते, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळते यावर हे जे शिजते आहे ते कुणाच्या पानात पडणार हे स्पष्ट होईल. पण प्रशांत किशोर यांची पवार भेट आणि उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींशी बंद खोलीतील चर्चा राजकारणातील निर्णायक वळणावर झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे आणि राजकारण शिजते आहे. सामान्यजनांना मात्र आपला रोजगार, व्यवसाय, भवितव्य याचीच चिंता आहे.
Previous Articleफिनलंडचा डेन्मार्कवर विजय
Next Article बेल्जियमची रशियावर एकतर्फी मात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.