मुंबई/प्रतिनिधी
संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना काहींना गांजा पिऊन बोलण्याची सवय लागल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मुंबईच्या माहीममध्ये शनिवारी भाजपाच्या विधानसभा कार्यालयाबाहेर पक्षाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड आणि नितेश राणे हे दोघे उपस्थित होते. यावेळी प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. “वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू”, असं म्हंटल होत. त्यामुळे प्रसाद लाड यांना शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असताना दुसरीकडे नितेश राणेंनी केलेल्या टीकेचा देखील शिवसेनेनं समाचार घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंनी केलेल्या विधानावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नितेश राणेंनी केलेल्या टीकेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला. नितेश राणेंनी “शिवसेना भवन हे आता कलेक्शन सेंटर झाले आहे”, अशी टीका केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी विचारताच संजय राऊतांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. “काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय लागली असेल, असं मी कुठेतरी वाचलं. या सगळ्या विषयांवर आम्ही बोलण्यापेक्षा आमचे स्थानिक शाखाप्रमुख बोलतील. हा शाखाप्रमुखांच्या स्तरावरचा विषय आहे. कोण आहेत नितेश राणे? सोडून द्या”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.