ऑनलाईन टीम / गोंदिया :
राज्य सरकारला विचारात न देता केंद्र सरकारने ‘एल्गार’ प्रकरणाची चौकशी एनआयएकडे सोपविली आहे. केंद्र शासनाचा हा निर्णय घटनाबाह्य आहे. केंद्र सरकारला यामधून काही लोकांना वाचवायचे आहे. त्यामुळेच केंद्राने हा निर्णय घेतल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेवेळी ते बोलत होते. देशमुख म्हणाले, ‘एल्गार’ प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य दिशेने सुरू होती. या प्रकरणात गोवल्या गेलेल्या निदोर्षांवर कोणतीही कारवाई होऊ नये, अशी आमची भूमिका होती. मात्र, केंद्र सरकारने राज्य सरकारला विचारात न घेतला या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे सोपविली आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो.
तसेच केंद्र सरकारचा हा निर्णय घटनाबाह्य असून, लवकरच यावर कायदेशीर सल्ला घेऊ, असेही देशमुख यांनी सांगितले.