आण्णाप्पा पाटील/ किणये
बेळगाव चोरला रस्त्यावर सुसाट धावणाऱया वाहनांमुळे स्थानिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहेत. यामुळे किणये रस्ता अपघातग्रस्त बनला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने या टिप्पर-डंपर चालकांवर अंकुश आणणे अत्यावश्यक बनले आहे.
बेळगाव-चोर्ला रोडवरील पिरनवाडी ते किणयेपर्यंतच्या रस्त्यावरून टिप्पर, डंपर यांची मोठी वर्दळ असते. ही वाहने सुसाट वेगाने धावतात. यामुळे परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. उचवडे परिसरात 6 खडीमशीन आहेत. या खडीमशीन येथून चिपिंग, खडी व बोर्डर घेऊन टिप्पर व डंपर वाहतूक करीत असतात. या टिप्पर, डंपर चालकांच्या वेगावर नियंत्रण कधीही नसते. नेहमीच सुसाट वेगाने धावत असतात. गेल्या पाच-सहा वर्षापासून किणये रस्त्यावर अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. या खडीमशीन मालकांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया किणये भागातील नागरिकांतून उमटू लागले आहेत. गेल्या पाच-सहा वर्षात या रस्त्यावर सर्वाधिक अपघात हे टिप्पर व डंपर यांच्यामुळे झाले आहेत. रस्त्याच्या बाजूला गावे, विविध प्रकारची कार्यालये, शाळा, दुकाने आहेत. त्यामुळे परिसरातील लोकांची वर्दळ या ठिकाणी कायम असते. किणये, बहाद्दरवाडी परिसरातील शेतकऱयांच्या जमिनीही या रस्त्याच्या बाजूला आहेत. त्यामुळे शेतकरी तसेच जनावरेही या रस्त्यावरून ये-जा करीत असतात, मात्र डंपरचा वेग पाहून सर्वजण भीतीच्या छायेखाली वावरत असतात. या टिप्पर, डंपर चालकांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा किणये येथे रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे..