खड्डय़ांमुळे वाहनधारकांना त्रास : प्रशासनाचे साफ दुर्लक्ष : सुसाट धावणाऱया वाहनांना लगाम घालण्याची स्थानिकांतून मागणी
वार्ताहर /किणये
किणये रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याचा बहुतांशी भाग उखडून गेला आहे. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. गेल्या चार वर्षांपासून रस्त्याची अशी स्थिती असूनही प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील कदमनगर ते किणयेपर्यंतचा रस्ता पूर्णपणे धोकादायक बनला आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
रात्रीच्या वेळी अपघातांच्या अनेक घटना
पिरनवाडी-बेळगाव-चोर्ला या आंतरराज्य मार्गावरून गोव्याला मोठय़ा प्रमाणात वाहनधारकांची ये-जा असते. नेहमी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. संतिबस्तवाड, बामणवाडी, बाळगमट्टी, नावगे, रणकुंडये, शिवनगर, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी आदी भागातील वाहनधारकांना या खड्डेमय रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील खड्डय़ांचा अंदाज दुचाकीस्वारांना येत नसल्याने अपघातांच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.
किणये-बहाद्दरवाडी गावाजवळ शाळा, महाविद्यालय आणि विविध कार्यालये आहेत. यामुळे या ठिकाणी स्थानिक लोकांची वर्दळ असते. मात्र, गोव्याला ये-जा करणारी वाहने सुसाट वेगाने धावतात. यामुळे स्थानिकांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.
दाद कुणाकडे मागायची?
किणयेतील बेळगाव-चोर्ला रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? लोकप्रतिनिधी अमुक भागात एवढा निधी खर्च करून अनेक विकासकामे राबवित असल्याचे सांगतात. बेळगाव-चोर्ला हा मुख्य रस्ता असून किणयेजवळच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही दाद कुणाकडे मागायची? रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन छेडण्याच्या तयारीत आम्ही आहोत.
– अनिल पाटील
वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज
मागील पाच-सहा वर्षांत किणये गावाजवळील रस्त्यावर अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. संतिबस्तवाड क्रॉस व किणयेजवळ झालेल्या अपघातांमध्ये जनावरेही दगावली आहेत. गोव्याला ये-जा करणारी वाहने सुसाट वेगाने धावतात. गाव, शाळा आल्यानंतर या वाहनधारकांनी आपल्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
– श्रीधर पाटील