कोरोनाच्या भीतीने घरात कोंडून घेण्याचा केव्हा तरी कंटाळा येईलच ना? घरात कोंडून घेतल्यावर केव्हा तरी पुन्हा हातांना काम मिळेल, घरात पैसे यायला सुरुवात होईल असे वाटण्याचा देखील केव्हा तरी कंटाळा येईलच ना? कोरोनाच्या लाटा मोजायचा कंटाळा येईलच ना? लस आली आहे असं समजल्यावर हातातली कामं टाकून धावत जाऊन केंद्रावर रांगेत उभं रहायचा देखील केव्हातरी कंटाळा येईलच ना?
मला कंटाळा आला आहे. माझ्या ओळखीच्या अनेकांना कंटाळा आला आहे. पण काय करणार? परवा असाच एक कंटाळलेला जीव भेटला. आम्ही बोललो. कोण काय बोललं हे महत्त्वाचं नाही. आम्ही एकमेकांना काय विचारलं आणि काय सांगितलं हे आमच्यासारख्यांच्या पुरतं तरी महत्त्वाचं आहे.
“झिकाबद्दल वाचलंस काय?’’ “नाही वाचलं. कोरोनाबद्दल वाचणं केव्हाच सोडून दिलंय. मोबाईलमधले सोशल मीडिया डिलीट केलेत आणि आता माझं मोबाईलचं बिल पूर्वीपेक्षा खूप कमी झालं आहे. केबल टीव्ही बंद केलाय आणि वृत्तवाहिन्या दिसायच्या थांबल्यात. त्या बिलाचे पैसे वाचायला सुरुवात झाली आहे. माझा एकूण मनस्ताप देखील कमी झालाय.’’
“थोडं माझं ऐक ना. अरे मी काल पेपरात झिकाबद्दल वाचलं. आणि मला सेम तशीच लक्षणं जाणवायला लागलीत. म्हणजे अगदी सगळी नाहीत. पण काही काही.’’ “तुला शंका असेल तर डॉक्टरकडे जाऊन ये. तपासणी करून घे. पण तुला सगळी लक्षणं जाणवत नाहीत असं तूच म्हणतोस.’’ “हो ना. डॉक्टरकडे जायची देखील भीती वाटते.’’ “पण त्याआधी मी फार पूर्वी वाचलेला अनंत काणेकरांच्या लघुनिबंधातला अनुभव सांगतो. एकदा त्यांनी वैद्यकविषयावरचं पुस्तक कुतूहलाने वाचायला घेतलं आणि नंतर त्यांना खूप टेन्शन आलं. त्यांनी म्हटलंय की त्या पुस्तकातली विविध रोगांची वर्णनं आणि लक्षणं वाचून स्वतःला प्रत्येक रोग झाल्यासारखा भास व्हायला लागला.’’
“बाप रे.’’ “म्हणून तुला एक सल्ला देतो. आजारपणाच्या बाबतीत फार विचार करू नये. तू देखील करू नकोस. चार शहाणी माणसं काय करतात, घराबाहेर पडताना मास्क लावतात, गर्दीची ठिकाणं टाळतात, स्वच्छता पाळतात. या सोप्या गोष्टी करायच्या. सहजी किंवा प्रयत्नांती लस मिळाली तर घ्यायची. आजारपण, त्यावरचे उपाय यावर विचार करायला डॉक्टर समर्थ आहेत. मुख्य म्हणजे, समाज माध्यमांवर येणारे अनाहूत सल्ले वाचायचे देखील नाहीत.’’