अन्नधान्याच्या किमतींमधील वाढ कारणीभूत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील महागाई कमी होण्याची चिन्हे नाहीत. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून 6.95 टक्क्यांवर पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये हा दर 6.07 टक्के राहिला होता. अशाप्रकारे किरकोळ महागाई दर 17 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर राहिला आहे. मार्च महिन्यात अन्नधान्याच्या किमतींमध्ये 7.68 टक्क्यांची भर पडली आहे. मागील महिन्यात हा आकडा 5.85 टक्के राहिला होता.
सलग तिसऱया महिन्यात किरकोळ महागाई दर हा रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक राहिला आहे. सरकारने महागाई दर 2-6 टक्क्यांदरम्यान ठेवण्याचे लक्ष्य रिझर्व्ह बँकेला दिले आहे. परंतु आरबीआय महागाई दर या कक्षेत ठेवण्यास आतापर्यंत अयशस्वी ठरला आहे.
औद्योगिक उत्पादनात वाढ
प्रामुख्याने खाण आणि वीज क्षेत्राच्या उत्तम कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन फेब्रुवारी महिन्यात 1.7 टक्क्यांनी वाढले आहे. मंगळवारी जारी शासकीय आकडेवारीनुसार निर्मिती क्षेत्राची वृद्धी मार्चमध्ये 0.8 टक्के राहिली. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात फेब्रुवारी 2021 मध्ये 3.2 टक्क्यांची घसरण झाली होती. 2021-22 या आर्थिक वर्षातील एप्रिल-फेब्रुवारीदरम्यान औद्योगिक उत्पादन वृद्धी 12.5 टक्के राहिली. तर एक वर्षापूर्वी याच कालावधीत यात 11.1 टक्क्यांची घसरण झाली होती. निर्मिती क्षेत्रात 11 महिन्यांमध्ये (एप्रिल-फेब्रुवारी) विक्रमी 12.9 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.