कसबा बीड ते कुडित्रे मोटरसायकल रॅली
प्रतिनिधी / वाकरे
केंद्र शासनाच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी आयोजित केलेला केलेल्या ‘भारत बंद’ला कुंभी कासारी परिसरात चांगला प्रतिसाद लाभला. या कायद्याला विरोध करण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात आला.
केंद्र शासनाने कृषी विषयक नवीन कायदा तयार केला असून त्याला देशभरातील शेतकरी संघटना दिल्लीत आंदोलन करून विरोध करीत आहेत. हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असून त्यामुळे शेतकरी भरडला जाणार आहे. म्हणून मंगळवारी आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी भारत बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कुंभी कासारी परिसरात आस्थापने, दुकाने, व्यवसाय, हॉटेल बंद करण्यात आली. या बंदमुळे बँकांमध्ये व्यवहार तुरळक सुरू होते.अन्य सर्व व्यवहार बंद झाले होते. काँग्रेस, शेतकरी संघटना आणि मित्र पक्षांच्यावतीने या नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी बीड शेड ते कुडित्रे कारखाना मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
कुंभी कासारी कारखान्यावरील राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत यशवंत सहकारी बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी देशभरातील शेतकरी पेटून उठला असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे सांगितले. शेतकरी अडचणीत येणार असून या सरकारला हद्दपार केले पाहिजे असे ते म्हणाले. करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केंद्र सरकारच्या नवीन कायद्याने शेतकरी भरडला जाणार असल्याने त्याला विरोध करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी झालेल्या सभेत बुद्धीराज पाटील, सज्जन पाटील (महे) ,बाजीराव देवाळकर (कोपार्डे),शामराव गोधडे, उत्तम पाटील, जगदीश पाटील व अन्य मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी कुंडलिक पाटील,सुभाष पाटील-वाकरे,एम. के.नाळे, सुनील कापडे, कृष्णात कुंभार इतर मान्यवर उपस्थित होते. दुपारी तीन वाजता या रॅलीची सांगता आणि बंद मागे घेण्यात आला.
कुडित्रे: शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या बंदवेळी झालेल्या सभेत बोलताना यशवंत बँकेचे अध्यक्ष पाटील एकनाथ पाटील, सोबत राजेंद्र सूर्यवंशी, बुद्धीराज पाटील,सज्जन पाटील, सुभाष पाटील , बाजीराव देवाळकर व इतर,सोबत सांगरुळ फाट्यावर असलेला कडकडीत बंद