प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे-काकोडा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी घेतलेल्या निवडणुकीच्या वेळी झालेला प्रकार हा नियमांविरुद्ध असून अपमानास्पद आहे. कारण नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होते त्यावेळेस स्वतः सरकारातील मंत्री नीलेश काब्राल सदर ठिकाणी उपस्थित राहतात व निवडणूक अधिकाऱयाच्या बाजूलाच स्थान घेतात. याचा अर्थ ते एक प्रकारचा दबाव नगरसेवकांवर टाकू पाहतात. या प्रकारामुळे कुडचडेचेही नाव खराब झालेले आहे. त्यांनी मुद्दामहून केलेल्या या प्रकारांचा स्वाभिमान गट निषेध करतो, असे जेम्स फर्नांडिस यांनी सांगितले.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाळकृष्ण होडारकर यांना विजय प्राप्त झाला. एक अनुभवी आमदार म्हणून तरी त्यांनी हा विजय स्वीकारायला पाहिजे होता. पण ज्या प्रकारे अविश्वास ठराव आणलेला आहे ते पाहता स्थानिक आमदार लोकशाहीची आणखी किती टर उडवतात ते बघायला पाहिजे. असे करायला नको होते. एकंदर प्रकारावरून दिसून आले आहे की, मंत्री काब्राल तसेच कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत हरलेले आहेत व कुडचडे-काकोडातील स्वाभिमानी जनतेचा विजय झाला आहे. हा विजय पुढे असाच होत राहील, असे फर्नांडिस म्हणाले.
स्वाभिमानी गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पुष्कल सावंत, विराज नागेकर, विकास भगत उपस्थित होते. कुडचडे पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत घडलेला प्रकार पाहता काही वेळेसाठी तरी मतदान करणाऱयांचा स्वाभिमान जागा झालेला होता. तो नंतर कोणाचा तरी स्वार्थ साधण्यासाठी व दबावामुळे दाबला गेला असावा. ती गोष्ट वेगळी आहे, असे मत सावंत यांनी व्यक्त केले.
स्वाभिमान पॅनलचे काही उमेदवार विजयी होऊ शकले नाहीत याचे जितके दुःख झाले होते त्याहून जास्त दुःख पालिकेत झालेल्या प्रकारामुळे झाले आहे. एखाद्या व्यक्तीचा अहंकार वाढू लागला व मर्यादेच्या पलीकडे गेला की, ती व्यक्ती चुका करत जाते. त्याचप्रमाणे स्थानिक आमदार चुका करत आहेत. याचा खरा अनुभव जनता त्यांना येणाऱया निवडणुकीत देईल यात कोणतीच शंका नाही. कुडचडेतील जनतेने आताच जागरूक होण्याची व स्वाभिमानी होऊन निर्णय घेण्याची गरज आहे, असे उद्गार भगत यांनी काढले.
पालिका निवडणुकांच्या आधी स्थानिक आमदार सांगत होते की, चार किंवा पाच उमेदवार बिनविरोध निवडून आणणार. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 15 पैकी 14 उमेदवार आपले निवडून येणार. पण शेवटी त्यांनी फक्त 11 उमेदवारांना जबरदस्तीने घेऊन मुख्यमंत्र्यांपुढे उभे केले. त्यानंतर जो प्रकार घडला तेथे त्यांच्याजवळ फक्त सात जण राहिले. यातून धडा घेऊन त्यांनी अशी कारस्थाने न करता स्वतःला सुधारावे आणि हुकूमशाही न करता वागावे, असे नागेकर म्हणाले.