उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्हय़ात खोही नामक गाव आहे. या गावचे रहिवासी कुत्र्यांवर प्रचंड प्रेम करतात. याच गावी काही दिवसांपूर्वी एका कुत्रीला एकाचवेळी पाच पिल्ले झाली, म्हणजेच ‘पंचाळे’ झाले. याचा गावकऱयांना इतका आनंद झाला की, त्यांनी या निमित्त गावजेवणच आयोजित केले. साधारणतः 2 हजार लोकांनी या मिष्टान्न भोजनाचा आनंद लुटला, अशी माहिती गावप्रमुखांनी दिली.
या भोजन कार्यक्रमाची रितसर आमंत्रण पत्रिकाही छापण्यात आली होती. गावकऱयांनी स्वतःच्या इच्छेने हा खर्च उचलला. गावातील सधन लोकांनी उदारहस्ते देणग्या दिल्या. तर ज्यांना पैशाचे योगदान करणे शक्य नव्हते, त्यांनी श्रमदान करून गावजेवणाचा हा कार्यक्रम यशस्वी केला, असे सांगण्यात आले.
या गावाचे कुत्र्यांवर इतके प्रेम का, याची एक दंतकथा सांगितली जाते. पूर्वीच्या काळी एकदा या गावात भीषण दुष्काळ पडला. लोकांची अन्नान्न दशा झाली. यावेळी गावातील कुत्र्यांनी श्रीकामद नाथ या देवाची मनोभावे प्रार्थना केली. या प्रार्थनेमुळे प्रसन्न होऊन देवाने या गावाचे अन्नपाण्याचे संकट दूर केले. तेव्हापासून या गावकऱयांना कुत्र्यांची इतकी माया आहे की तिला तोड सापडणार नाही. या गावात कुत्र्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले जात आहे.