जांबोटी / वार्ताहर
बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावर कुसमळी गावानजीक मलप्रभा नदीवरील अरुंद पुलावर सोमवारी रात्री समोरासमोर दोन ट्रकचा अपघात झाल्यामुळे या रस्त्यावरील बेळगाव-गोवा ही आंतरराज्य वाहतूक मंगळवार दुपारपर्यंत ठप्प झाल्याने वाहनधारक व प्रवासी वर्गाची गैरसोय झाली.
बेळगाव-पणजी व्हाया चोर्ला राज्य महामार्गावर कुसमळी गावानजीक असलेल्या मलप्रभा नदीवर ब्रिटीशकालीन जीर्ण झालेला अरुंद पूल आहे. सदर पूल शंभर वर्षापेक्षा जुना असल्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. मात्र वाहतुकीसाठी पर्यायी पूल उपलब्ध नसल्यामुळे या पुलावरुनच प्रवासी व माल वाहतूक चालते. तसेच या रस्त्यावरुन परवानगी नसताना देखील अवजड वाहतूक मोठय़ा प्रमाणात चालते. कुसमळी नजीकच्या ब्रिटीशकालीन पुलाची रुंदी केवळ 3.5 मिटर्स असल्यामुळे हा पूल अवजड वाहनासाठी धोकादायक बनला आहे. सोमवारी रात्री बेळगावहून गोव्याला जाणाऱया व गोव्याहून बेळगावकडे येणाऱया खनिज वाहतूक करणाऱया दोन चौदा चाकी ट्रक या पुलाच्या मधोमध समोरासमोर अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी अपघातामुळे या पुलावरुन दुचाकी वाहने पास होण्यास देखील जागा उपलब्ध नसल्यामुळे सोमवारी रात्रीपासून बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्यामुळे बेळगावहून गोव्याला जाणाऱया प्रवासी व अन्य वाहनधारकांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. सोमवारी रात्री ठप्प झालेली वाहतूक मंगळवारी दुपारी 12 वाजता क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहनाना बाजूला काढून सुरळीत करण्यात आली.
कुसमळी गावानजीक असलेल्या ब्रिटीशकालीन अरुंद पुलावरुन परवानगी नसताना देखील राजरोसपणे अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्यामुळे या पुलावर अपघाताची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात वाढली असून लहान मोठय़ा अपघातामुळे देखील पुलावरुन होणारी वाहतूक ठप्प होत असल्यामुळे प्रवासी वर्गाचे मोठय़ा प्रमाणात हाल होत असून वाहनधारकांना गोव्याला जाण्यासाठी पिरनवाडी, खानापूर, जांबोटी वळसा घालून प्रवास करावा लागत असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी लक्ष घालून कुसमळी नजीकच्या ब्रिटीशकालीन पूल हटवून त्वरित नवीन पूल बांधावा, अशी मागणी होत आहे.