बंगालमध्ये 10 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान कूचबिहार जिल्हय़ातील सीतलकुचीमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारादरम्यान कथितरित्या सीआयएसएफकडून स्वरक्षणार्थ करण्यात आलेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला होता. यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसकडून सीआयएसएफला लक्ष्य करण्यात येत आहे. या फायरिंगप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे.
शवविच्छेदन अहवालानुसार मारले गेलेल्या 4 जणांपैकी एकाच्या शरीरावर स्प्लिंटरच्या जखमा आढळून आल्या आहेत. विविध प्रकारच्या स्प्लिंटरचा वापर देशी बॉम्ब किंवा आयईडी निर्मितीत केला जातो. याचबरोबर स्प्लिंटरद्वारे झालेल्या जखमांच्या खुणा हँडग्रेनेड किंवा शॉटगनमध्ये वापरल्या जाणाऱया गोळय़ांमुळेच असू शकतात.
याप्रकरणी तृणमूल काँग्रेसकडून अनेक आरोप करण्यात येत आहेत. केंद्रीय सुरक्षा दलांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करत कारवाईची मागणी तृणमूलकडून करण्यात येत आहे. तर शवविच्छेदन अहवालात स्प्लिंटरच्या जखमांचा तपशील पाहता हा एक पूर्वनियोजित कट असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय सुरक्षा दलांकडे शॉटगन नाही तसेच घटनेवेळी कुठल्याही प्रकारच्या ग्रेनेडचा वापर झालेला नव्हता.
काही समाजकंटकांकडून मतदार आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयावर देशी बॉम्ब किंवा शॉटगनचा वापर करण्यात आला असावा, ज्यानंतरच निमलष्करी दल सीआयएसएफला मतदार तसेच निवडणूक अधिकाऱयांना वाचविण्यासाठी नाईलाजास्तव गोळीबार करावा लागला असेल. या घटनेच्या 2 दिवसांपूर्वीच ममतांनी केंद्रीय सुरक्षा दलांना घेराव घालण्यास समर्थकांना सांगितले होते.
सीतलकुचीमध्ये एका मतदान केंद्रावर गेळीबाराची घटना स्थानिक लोकांच्या गैरसमजातून सुरक्षा कर्मचाऱयांवर हल्ला करण्यात आल्यावर झाली आहे. गैरसमजातून शेकडोंच्या संख्येतील उग्र लोकांच्या जमावाने सीआयएसएफ जवानांवर हल्ला केला होता. बूथवर ठेवण्यात आलेली सामग्री पळवून नेण्याचा प्रयत्न झाला होता. यादरम्यान बूथ कर्मचाऱयांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. जमावाला नियंत्रित करण्यादरम्यान सीआयएसएफ जवानही जखमी झाल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले होते.
बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान विविध ठिकाणी हिंसाचार झाला असून अनेक ठिकाणी देशी बॉम्ब मिळाले आहेत. अशा हिंसक घटना वारंवार समोर आल्याने निमलष्करी दलांना योग्यप्रकारे निवडणूक करविण्यासाठीच बंगालमध्ये तैनात करण्यात आले आहे.