प्रतिनिधी/ दापोली
नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरी व रायगड जिह्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची आपण पाहणी केली. राज्य शासनाने यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. आता आपण दिल्लीला जाऊन केंद्र सरकारकडून रायगड व रत्नागिरी जिह्यासाठी भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
ते पुढे म्हणाले की, दोन जिह्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान घरांचे झाले आहे. घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने पूर्ण घर पडलेल्यांना दीड लाखांची मदत जाहीर केली असली तरी दीड लाखात कोणाचेही घर उभे रहात नाही. या वादळात ज्यांच्या घराची पूर्णतः हानी झाली आहे, अशांना 3 लाख रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच शेती बागायतीसाठी एकरी 50 हजार ही मदत अत्यंत कमी आहे. यासाठी सरकारने एकरी 1 लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी यांना वेगवेगळे निकष लावून तातडीची मदत देणे गरजेचे आहे.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य मधुकर उर्फ दादा मर्चंडे, जिल्हा अध्यक्ष के. डी. कदम, जिल्हा सरचिटणीस प्रीतम रुके, जिल्हा युवक अध्यक्ष आदेश मर्चंडे, जिल्हा संपर्कप्रमुख अजित तांबे, दापोली तालुका उपाध्यक्ष संजय तांबे, संघटक अनिल जाधव, जितेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव लोखंडे उपस्थित होते.