प्रतिनिधी/ चिपळूण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना महापुरामुळे झालेल्या संपूर्ण नुकसानीची माहिती देऊन जास्तीत-जास्त मोठे पॅकेज आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी येथील पूरग्रस्तांना दिले.
काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते रविवारी येथे आले होते. त्यांनी शहरासह खेर्डी भागाची पाहणी करून काही व्यापारी व पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी पूरग्रस्तांनी पाणी किती वेगाने आले, त्यामुळे साहित्य उचलणे किती कठीण बनले, जीव कसे वाचवले, याची कहाणी सांगितली. यावर संभाजीराजे यांनी महापुरामुळे बाजारपेठेसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून न येणारे आहे. तरीही तुम्हाला या संकट काळात थोडीफार मदत होऊन तुम्ही यातून सावरावे, यासाठी मी पुढाकार घेणार आहे. येथून गेल्यावर थेट दिल्लीत जाऊन पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची भेट घेऊन त्यांना महापुरामुळे झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती देणार आहे. एवढेच नव्हेतर त्यांच्याकडून जास्तीत जास्त मोठे पॅकेज आणण्याचा आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे.
यावेळी निवासी नायब तहसीलदार तानजी शेजाळ यांनीही प्रशासनाने आतापर्यंत काय कार्यवाही केली, किती पंचनामे पूर्ण झाले, सध्या काय काम केले जात आहे, याची माहिती दिली. प्रशासनाच्या आतापर्यंतच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत मदतीचा वेग वाढवण्याच्या सूचना केल्या.