‘लखीमपूर खेरी’प्रकरणी 12 तास कसून चौकशी – खून, अपघाती मृत्यू, गुन्हेगारी कट, निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका
वृत्तसंस्था/ लखनौ
लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या सातव्या दिवशी मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अखेर शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अटक झाली. सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर आशिषला अटक करण्यात आली. खून, अपघाती मृत्यू, गुन्हेगारी कट आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे या कलमांखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी आशिष मिश्रा याने तपास करणाऱया गुन्हे शाखेसमोर शरणागती पत्करली होती. नोटीस पाठवून त्याला सकाळी 11 वाजता गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्याने गुन्हा शाखेच्या कार्यालयात जाताना आपला चेहरा रुमालाने लपविला होता. कार्यालयाबाहेर गर्दी असल्याने पोलिसांनी त्याला गुन्हे शाखेच्या मागील दरवाजाने प्रवेश दिला. त्यानंतर सहा अधिकाऱयांच्या टीमकडून त्याची दिवसभर ‘झाडाझडती’ सुरू होती. चौकशीत लखीमपूर खेरी शेतकरी मृत्यू प्रकरणात त्याचा सहभाग दिसून आल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्याच्यादृष्टीने पुढील तयारी सुरू होती. चौकशीदरम्यान सहा अधिकाऱयांच्या पथकाने त्याच्यावर अनेक प्रश्नांचा भडिमार केला. मात्र, चौकशीतील अधिक तपशिल पुढे आलेला नाही. 12 तासाच्या त्याच्यासाठी 11 वेळा चहा-नाष्टा पुरविण्यात आला. चौकशीवेळी गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बचावाचा प्रयत्न, पण…
आशिष मिश्रा याचे दंडाधिकाऱयांसमोर सकाळी 11 वाजल्यापासून लिखित निवेदन नोंदवले जात होते. त्याच्यासोबत वकील आणि मंत्री अजय मिश्रा यांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नोटीस मिळूनही तो तपास यंत्रणांसमोर हजर झाला नव्हता. आपला पुत्र आशिष याची प्रकृती चांगली नसल्यामुळे तो शुक्रवारी तपास यंत्रणेसमोर उपस्थित राहू शकला नाही. तो पूर्णतः निर्दोष आहे. तो तपासाला सहकार्य करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी केले होते.
लखीमपूर खेरी प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष याच्यावर आरोप होता. त्यांच्या ताफ्यातील एक कार शेतकऱयांच्या जमावात घुसल्याने चार शेतकऱयांचा मृत्यू झाला होता. नंतरच्या हिंसाचारात कारचा एक चालक, भाजपचे दोन कार्यकर्ते आणि एका पत्रकाराची हत्या करण्यात आली होती. एका जनहित याचिकेच्या माध्यमातून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेश सरकार योग्यरित्या हाताळत नसल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. शुक्रवारी राज्य सरकारच्या वतीने स्थितीदर्शक अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र, त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पर्यायी तपास यंत्रणेकडून हा तपास केला जाता येईल का ते पहावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली होती.
शेतकरी संघटनांचा आंदोलनाचा इशारा
संयुक्त किसान मोर्चा 12 ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेशातील सर्व जिह्यांमध्ये ‘कलश यात्रा’ काढणार आहे. तसेच 18 ऑक्टोबरला ‘रेल रोको’ आंदोलन आणि 26 ऑक्टोबर रोजी लखनौमध्ये ‘महापंचायत’ कार्यक्रमही होणार असल्याचे योगेंद्र यादव यांनी शनिवारी जाहीर केले. संयुक्त किसान मोर्चाने सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. शेतकऱयांच्या बाबतीत घडलेली ही घटना गंभीर असून या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबरोबरच आशिष मिश्रा यांच्या अटकेची मागणी संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) केली आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून याप्रकरणी जोरदार आवाज उठवला जात आहे.
शेतकरी संघटनांकडून अटकेची मागणी
दुसरीकडे, संयुक्त किसान मोर्चाने सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. शेतकऱयांच्या बाबतीत घडलेली ही घटना गंभीर असून या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबरोबरच आशिष मिश्रा याच्या अटकेची मागणी संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) केली आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून याप्रकरणी जोरदार आवाज उठवला जात आहे. विरोधकांच्या या मागणीला अखेर यश आले आहे.
नवज्योत सिद्धूंनी मौनव्रत सोडले
येथे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी आपले मौनव्रत आंदोलन सोडले आहे. सिद्धू शुक्रवारी लखीमपूरला पोहोचले होते. त्यांनी प्रथम हिंसाचारात मारला गेलेला शेतकरी लवप्रित आणि नंतर पत्रकार रमण यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. जोपर्यंत केंद्रीय मंत्र्यांच्या आरोपी मुलाला अटक होत नाही, तोपर्यंत मौन पाळून उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तथापि, सुमारे 20 तासांनंतर त्यांनी मौनव्रत सोडले.