उडानमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने कौतुक : विमान प्रवासाच्या परिस्थितीचा घेतला आढावा
प्रतिनिधी /बेळगाव
भारतातील सर्वसामान्य नागरिकांना विमान प्रवास सोयीचा व्हावा, यादृष्टीने उडान योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. देशातील 2 टायर व 3 टायर शहरांना जोडण्यासाठी उडान योजनेने मदत केली. उडानमुळे प्रवाशांना अल्पदरात विमान प्रवास करता येवू लागला. यामुळेच प्रवासी संख्या झपाटय़ाने वाढली असून बेळगाव विमानतळ हे याचे एक उत्तम उदाहरण आहे, अशी प्रशंसा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी केली.
देशांतर्गत विमान उडानाच्या भाडय़ात शिथिलता, कोरोनामुळे विमान प्रवासाची झालेली परिस्थिती यावर आढावा बैठक व्ही. के. सिंग यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी त्यांनी बेळगावसह किशनगड, दरभंगा या विमानतळांचे कौतुक केले. उडान योजनेतून आतापर्यंत 86 लाख प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोरोनामुळे बरीच उड्डाणे बंद होती. परंतु सध्याच्या घडीला 948 उडान मार्गांपैकी 403 मार्ग सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये 65 विमानतळांचा समावेश आहे. बेळगावातून 13 शहरांना उडानमधून मार्ग मंजूर झाले होते. हैदराबाद, तिरुपती, मुंबई, पुणे, सूरत, कडप्पा, म्हैसूर, इंदूर, जोधपूर, जयपूर, अहमदाबाद, नाशिक, नागपूर या शहरांना उडानअंतर्गत मार्ग मंजूर झाले होते. यातील काही मार्ग सोडता इतर सर्व मार्गांवर विमान वाहतूक सुरू आहे. कमी दरात विमान प्रवास करता येत असल्याने प्रवाशांचाही प्रतिसाद वाढला आहे.