मुंबई / ऑनलाईन टीम
देशासह सध्या राज्यात कोरोना लसीकरण मोहिम जोरात सुरु आहे. लस घेण्यापूर्वी सर्व नागरिकांना अॅपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र केंद्राने सांगितलेल्या कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने लाखो नागरिकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला स्वतंत्र अॅप निर्मितीची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, कोविन-अॅप मध्ये अनेक तांत्रिक त्रुटी येत आहेत. लॉगिन व ‘ओटीपी’साठी विलंब अशा अनेक तक्रारी येत आहेत. एका मध्यवर्ती अॅपवरून जवळपास 1.3 अब्ज भारतीयांची वेळेवर नोंदणी होणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत महत्त्वपूर्ण अशा लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची आहे. त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत असेही जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक राज्याला स्वतंत्र अॅप तयार करून द्यावे किंवा महाराष्ट्र सरकारला स्वतःची अॅप निर्माण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. केंद्रसरकारने यावर तात्काळ विचार करावा, असे देखील जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले आहे.