प्रतिनिधी / कोल्हापूर
आरटीओतील मोटार वाहन निरीक्षक आणि कोल्हापूर महापालिकेच्या केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक सुभाषचंद्र नारायण देसाई वय 49, गाव तळेवाडी, नेसरी, ता. गडहिंग्लज यांचे शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तळेवाडीत शनिवारी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार 15 जून रोजी सकाळी 8 वाजता आहे.
सुभाषचंद्र देसाई नेसरी जवळील तळेवाडीचे. कोल्हापूरच्या आरटीओमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय जबाबदारी सांभाळण्याआधी त्यांनी कराड व इतर ठिकाणीही सेवा बजावली होती. त्यांचे भाऊ अरविंद देसाई हे देखील आरटीओमध्ये मोटार वाहन निरीक्षक आहेत. 12 जानेवारीला देसाई यांनी केएमटीच्या अतिरिक्त व्यवस्थापकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. केएमटीचे अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, चालक, वाहक यांच्याशी त्यांचा संवाद होता. तोटा कमी करून केएमटी फायद्यात आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते. कोरोनामुळे केएमटीची सेवा थांबल्याने प्रयत्नांना थोडा बेक लागला होता. देसाई यांची शरीरयष्टी एखाद्या ऍथलिट सारखी होती. ते नियमित व्यायामही करत. शुक्रवारी दिवसभर कोल्हापूर महापालिकेची वेशेष अर्थसंकल्पिय सभेला ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. सभा झाल्यानंतर त्यांनी घरी परतण्याआधी बुद्ध गार्डन येथील केएमटीच्या यंत्रशाळेला भेटही दिली होती. सायंकाळी त्यांना त्रास होऊ लागल्याने प्रारंभ शास्त्रीनगरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना बडय़ा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव मूळ गाव तळेवाडीत नेण्यात आले. तेथे पहाटे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महापालिकेची श्रद्धांजली
बुद्ध गार्डन येथील केएमटीच्या यंत्रशाळेत शनिवारी सकाळी देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, सदस्य अशोक जाधव, तांत्रिक सल्लागार प्रतापराव भोसले, केएमटीचे जनसंपर्क व कामगार अधिकारी संजय इनामदार, वर्कस् मॅनेजर अमरसिंह माने यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक, यंत्रचालक उपस्थित होते.
केएमटीचा एकही रूपया न घेता काम
सुभाषचंद्र देसाई यांनी 12 जानेवारीला केएमटीच्या अतिरिक्त व्यवस्थापकपदाची सूत्रे स्वीकारली. केएमटीची आर्थिक स्थिती सावरण्याचे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू होते. एकही रूपया मानधन न घेता ते केएमटीची जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या अकस्मिक निधनाने केएमटीच्या कर्मचाऱयांना धक्का बसला आहे.