प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई स्कूल ऑफ म्युझिकच्यावतीने बेळगावच्या रहिवासी आणि सध्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या अश्विनी गोरे-देशपांडे यांची नाटय़संगीताची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत त्यांनी ‘बालगंधर्व ते बकुल पंडित’ यांच्या नाटय़गीतांचा आढावा घेत अनेक नाटय़गीते सादर केली.
कार्यक्रमाची सुरुवात स्कूल ऑफ म्युझिकमधील विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने झाली. प्राचार्या स्नेहा राजुरीकर यांनी सर्वांचे स्वागत करून स्कूल ऑफ म्युझिकच्या कार्याची माहिती दिली. डॉ. दुर्गा नाडकर्णी यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केएलई विद्यापीठाचे प्रा. डॉ. मदन गोडबोले आणि उज्ज्वला गोडबोले उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
अश्विनी यांनी ‘पंचतुंड नररुंड मालाधर’ या नांदीने गायनाला प्रारंभ केला. यानंतर ‘सृजन कसा मन चोरी’, ‘वद जाऊ कुणाला शरण गं’, ‘खरा तो प्रेमा’, ‘सोहम डर डमरू बाजे’, ‘लागी कलेजवा कटार’ ‘उगवला चंद्र पुनवेचा’, ही नाटय़गीते अतिशय लीलया सादर केली.
‘निर्गुणाचा संग’ हा अभंगही अतिशय तयारीने सादर केला. ‘जोहार मायबाप’ या अभंगाने त्यांनी सांगता केली. गाण्यांची उत्तम निवड, प्रत्येक गाण्यांमधील त्यांची तयारी, अतिशय सुंदर गंधर्व तान आणि भावपूर्ण गाण्यामुळे ही मैफल रंगली. त्यांना तबल्यावर साथ स्कूल ऑफ म्युझिकचे शिक्षक राजेंद्र भागवत यांनी केली. संवादिनीवर साथ मुकुंद गोरे यांनी तर टाळाची साथ जितेंद्र साबण्णावर यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन मानसी बेडेकर यांनी केले. डॉ. सुनीता पाटील यांनी आभार मानले.