चेन्नई / वृत्तसंस्था
आंद्रे रसेलने 15 धावातच 5 बळी…..20 षटकात मुंबईच्या खात्यावर केवळ 152 धावा….केकेआरतर्फे नितीश राणा, शुभमन गिल यांची 72 धावांची सलामी….अशा अनेक प्रतिकूल बाबींची गोळाबेरीज हातावेगळी करत मुंबई इंडियन्सने मंगळवारी आयपीएल साखळी सामन्यात थेट केकेआरच्या जबडय़ात हात घालून त्यांचा विजयाचा घास अक्षरशः काबीज केला आणि या मोसमातील आणखी एका रोमांचक निकालाची नोंद झाली.
मुंबईला येथे प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 152 धावा करता आल्या. पण, प्रत्युत्तरात केकेआरला 20 षटकात 7 बाद 142 धावांवरच समाधान मानावे लागले आणि मुंबईने 10 धावांनी धडाकेबाज विजय संपादन केला.
विजयासाठी 153 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना नितीश राणा (47 चेंडूत 57) व शुभमन गिल (33) यांनी 8.5 षटकातच 72 धावांची सलामी साकारली आणि विजयासाठी अर्धी वाटचाल पार करुन दिली. पण, आश्चर्य म्हणजे केकेआरतर्फे या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.
राहुल चहरने 27 धावात 4 बळी घेत केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आणि त्याला ट्रेंट बोल्ट (2-27), कृणाल पंडय़ा (4 षटकात 1-13), बुमराह (4 षटकात 0-28) यांनी समयोचित साथ दिली.
केकेआर ः नितीश राणा यष्टीचीत गो. डी कॉक, गो. चहर 57 (47 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), शुभमन गिल झे. पोलार्ड, गो. चहर 33 (24 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), राहुल त्रिपाठी झे. डी कॉक, गो. चहर 5 (5 चेंडू), इयॉन मॉर्गन झे. जान्सन, गो. चहर 7 (7 चेंडूत 1 चौकार), शकीब हसन झे. यादव, गो. कृणाल 9 (9 चेंडूत 1 चौकार), दिनेश कार्तिक नाबाद 8 (11 चेंडू), आंद्रे रसेल झे. व गो. बोल्ट 9 (15 चेंडूत 1 चौकार), पॅट कमिन्स त्रि. गो. बोल्ट 0 (1 चेंडू), हरभजन सिंग नाबाद 2 (2 चेंडू). अवांतर 12. एकूण 20 षटकात 7 बाद 142.
गडी बाद होण्याचा क्रम
1-72 (शुभमन, 8.5), 2-84 (त्रिपाठी, 10.3), 3-104 (मॉर्गन, 12.5), 4-122 (नितीश राणा, 14.6), 5-122 (शकीब हसन, 15.2), 6-140 (रसेल, 19.3), 7-140 (कमिन्स, 19.4).
गोलंदाजी
ट्रेंट बोल्ट 4-0-27-2, मार्को जान्सन 2-0-17-0, जसप्रित बुमराह 4-0-28-0, कृणाल पंडय़ा 4-0-13-1, केरॉन पोलार्ड 1-0-12-0, राहुल चहर 4-0-27-4, रोहित शर्मा 1-0-9-0.
शेवटच्या 2 षटकातील बुमराह, बोल्टचा भेदक मारा निर्णायक
पूर्ण सामन्यात वरचष्मा गाजवणाऱया केकेआरला शेवटच्या 2 षटकात 19 धावांची गरज असताना आंद्रे रसेल व दिनेश कार्तिकसारखे अव्वल फलंदाज क्रीझवर होते. मात्र, बुमराहने 19 व्या षटकात केवळ चारच धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात 15 धावांचे संरक्षण करण्याची जबाबदारी बोल्टने चोख पार पाडली. या षटकात त्याने केवळ 4 धावा देताना 2 बळी घेतले आणि येथेच मुंबईच्या या हंगामातील पहिल्यावहिल्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
राहुल चहर गोलंदाजीला आला आणि सामन्याचे चित्रच बदलले!
वास्तविक, या सामन्यावर पहिल्या टप्प्यापासून फक्त केकेआरचेच वर्चस्व होते. मुंबईला 152 धावांवर रोखले, त्यावेळी देखील केकेआरचे पारडे जड मानले जात होते आणि नितीश राणा (57), शुभमन गिल (33) यांनी 72 धावांची सलामी साकारत त्या दिशेने आगेकूचही करुन दिली होती. पण, राहुल चहर गोलंदाजीला आल्यानंतर अचानक या सामन्यातील सर्व समीकरणांची मोठी उलथापालथ झाली आणि मुंबई इंडियन्सने अशक्यप्राय विजयावर कब्जा केला. राहुल चहरने येथे शुभमन गिल, राहुल त्रिपाठी व मॉर्गन असे 3 मोहरे 27 धावांमध्येच गारद केले.
सामन्याचा टर्निंग पॉईंट….15 ते 20 व्या षटकात केकेआरच्या फक्त 20 धावा!
विजयासाठी 153 धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ 15 व्या षटकाअखेर 4 बाद 122 अशा उत्तम स्थितीत होता. पण, आश्चर्य म्हणजे शेवटच्या 5 षटकात त्यांना जेमतेम 20 धावा करता आल्या आणि हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. या 5 षटकांपैकी कृणाल पंडय़ा, बुमराह यांनी प्रत्येकी 2 तर बोल्टने 1 षटक टाकले होते.