प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
केपे तालुक्मयात असलेल्या खाणींवरचा माल उचलण्यासाठी आणि त्याची वाहतूक करण्यासाठी किती आणि कुठले ट्रक घ्यावेत यासंबंधी ट्रकमालकांच्या विविध गटांमध्ये असलेला वाद सोडविण्यासाठी सदर गट आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यात लक्ष घालून वादाचे निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. तो वाद सुटण्याच्या मार्गावर आहे, असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी स्पष्ट केलेले आहे.
ट्रकमालकांच्या विविध गटांबरोबरच्या चौथ्या बैठकीनंतर ते बोलत होते. बेतूल येथील कवळेकर यांच्या राहत्या घरी पार पडलेल्या या बैठकीस कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस व कुंकळ्ळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विदेश देसाई हजर होते. या बैठकीला आंबावली ट्रकमालक संघटना, मायणा ट्रकमालक संघटना, कावरे ट्रकमालक संघटना आणि या भागांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व खाणींचे व्यवस्थापक मंडळ मिळून साधारणपणे 200-300 लोक उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे, 15 मार्च, 2018 च्या आधी कायदेशीरपणे उत्खनन झालेल्या खनिजाची वाहतूक करण्यास जानेवारी, 2021 च्या अखेरपर्यंत परवानगी आहे. उत्खनन झालेला माल उचलण्यासाठी 2012 च्या आधी ज्या ट्रकमालकांचे ट्रक या खाणींवर कार्यरत होते त्या सर्वांना परत रूजू करून घेण्याच्या बाबतीत सदर खाणी ज्या भागांमध्ये आहेत तेथील स्थानिक ट्रकमालक संघटना आणि आजुबाजूच्या भागांतील ट्रकमालक संघटना यांच्यामध्ये मतभेद आहेत. आतापर्यंत 4 बैठका घेऊन हे मतभेद दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत. आणखी एखाद्या बैठकीनंतर प्रश्न सुटेल, असे कवळेकर यांनी सांगितले.
खाणी बंद झाल्यामुळे सर्वच ट्रकमालकांवर बेकारीची कुऱहाड कोसळली. हा प्रश्न तसा भावनिक आहे. निव्वळ व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून असे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे आपण खाणींचे व्यवस्थापक मंडळ आणि ट्रकमालक या दोन्ही गटांना बोलावले. आता प्रश्न सुटणार असे दिसायला लागले आहे. पुढच्या बैठकीला आमदार डायस आणि संघटनांचे अध्यक्ष एवढेच उपस्थित असतील. तसेच किती माल आहे आणि किती ट्रक वापरावेत, स्थानिक रस्ते आणि खनिजमालाची ज्या रस्त्यांवरून वाहतूक होणार त्या मार्गावरील स्थानिकांना अतिप्रमाणातील ट्रकांचा त्रास होऊ नये या सर्व बाबींचा विचार करूनच या प्रश्नावर तोडगा काढला जाणार असल्याचे कवळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
कवळेकरांवर पूर्ण विश्वास
उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे स्थानिक ट्रकमालक सुरेंद्र फळदेसाई यावेळी म्हणाले. खाणी बंद झाल्यामुळे सर्वच ट्रकमालकांना त्रास झाला आहे. आता काही प्रमाणात खनिजमालाची वाहतूक करायला परवानगी मिळाल्यामुळे निदान तेवढी तरी मदत आम्हाला आणि आमच्या परिवारांना होणार. उपमुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत शिताफीने आमचे प्रश्न समजून व स्थानिक संघटनांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याच्या मार्गावर आणला आहे, असे ते पुढे म्हणाले.