विशेष प्रतिनिधी/ देवरुख
आठ वर्षापूर्वी झालेल्या अपमानाचा बदला घेण्याच्या उद्देशाने रत्नागिरीतील एकाने कोंडगाव (साखरपा) येथील वृध्दाचा डोक्यात दगडी जाते घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सुभाष रामचंद्र काळोखे (73, कोंडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संशयित म्हणून अभिजित भिकूजी पाटील (नाचणे रोड, रत्नागिरी) याला देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत देवरुख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील संशयित आरोपी अभिजीत हा 2012 साली सुभाष यांच्या मुलीशी लग्न करण्याचा तगादा लावून होता. तो वारंवार त्रास देऊ लागल्याने सुभाष यांनी त्याला समजावून त्याच्या श्रीमुखात भडकावली होती. त्यानंतर तातडीने त्यांनी आपल्या मुलीचे लग्न दुसऱया मुलाशी लावून दिले. या गोष्टींचा राग मनात धरून अभिजीत याने सुभाष हे घरी एकटे राहत असल्याचा फायदा घेत 14 ऑगस्टच्या रात्री 10:30 च्या सुमारास तिथेच असलेले दगडी जाते त्यांच्या डोक्यात घालत त्यांना ठार मारले व तो फरार झाला. शनिवारी मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला. याची खबर सुभाष यांचा मुलगा उदय याने पोलिसांना दिली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय तुषार पाचपुते, हेडकॉन्स्टेबल भुजबळराव, संदेश जाधव व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर अधिक चौकशी करून पोलिसांनी अभिजीत याला अटक केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते अधिक तपास करत आहेत.