सुटीवरच्या कर्मचाऱयांनाही पाठवावी लागते आरोग्याची हजेरी : कोरोनाने कर्मचारी दगावल्याने कोकण रेल्वे प्रशासनाची दक्षता : कंत्राटी कामगारांचीही घेतली जातेय काळजी
अजय कांडर / कणकवली:
कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. माणसांचा जीव भयभीत झालेला आहे. विविध व्यवस्थापनात काम करणारी मंडळीही जीवाची काळजी घेत काम करत आहेत. अनेक व्यवस्थापनांनी कर्मचाऱयांना घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, कोकण रेल्वेचे काही कर्मचारी अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत आहेत. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱयांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱयांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेण्याची तत्परता दाखविली असून प्रशासनाकडून कर्मचाऱयांच्या आरोग्याचे रोज अपडेट मागविले जात आहेत. सुटीवरच्या कर्मचाऱयांनाही आरोग्याची हजेरी रोज पाठवावी लागते. कोकण रेल्वे प्रशासनाची ही दक्षता इतर व्यवस्थापनाला आदर्शवत ठरली आहे.
कोरोनामुळे 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलसह लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ाही बंद करण्यात आल्या. मात्र, कोकण रेल्वेने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्याने कोरोनाच्या काळात कर्मचाऱयांना कार्यालयात नियमित यावे लागत आहे. यात 30 टक्के कर्मचारी सध्या कामावर कार्यरत असूनही कोकण रेल्वेच्या दोन कर्मचाऱयांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे प्रशासन सावध झाले. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने आपल्या कर्मचाऱयांची नियमित नोंद ठेवण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्रात अन्य खात्यांतील अनेक कर्मचाऱयांचा कोरोनाने मृत्यू झाला, तरी त्यांच्या व्यवस्थापनाने अशी काळजी घेतलेली नाही. कोकण रेल्वेची ही दक्षता इतर व्यवस्थापनांना आदर्श असून कोकण रेल्वेच्या या दक्षतेचे कौतूक होत आहे.
सलोख्याचे व्यवस्थापन
कोरोनाच्या काळात कर्मचारी कामावर नसला, तरी त्याला आपल्या व कुटुंबियांच्याही तब्येतीची नोंद ठेवून रोज हजेरी आपल्या वरिष्ठांकडे पाठवावी लागते. ही हजेरी पाठविली गेली नाही, तर कर्मचाऱयाला वरिष्ठांकडून विचारणाही होते. यामुळे कोरोनाने कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सलोख्याचे वातावरण निर्माण केल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वेने कोरोनाच्या प्रारंभीच्या काळातच कर्मचाऱयांच्या दक्षतेबाबत काही उपाययोजना करायला प्रारंभ केला होता. त्यात सॅनिटायझर्स, संरक्षक मुखवटे, साबण तसेच आवश्यकता असेल, त्याप्रमाणे अन्नधान्याचा पुरवठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आदी गोष्टींचा समावेश आहे.
परताव्याची मुदत वाढली
दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे ज्यांचे आरक्षण होते, त्यांचे आरक्षण 21 जूनपर्यंत रद्द करता येईल, असे रेल्वेने आधी जाहीर केले होते. त्यानंतर या परतव्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. तथापी, तूर्त या 30 जूनपर्यंतच्या तिकिटांच्या परताव्याची मुदत पुढील सहा महिन्यापर्यंत वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वेने घेतला आहे. कोकण रेल्वेच्या तिकिटांचा परतावा काही ठराविक वेळेत रेल्वे खिडकीवर देण्यासाठी रेल्वेने तत्परता दाखविली आहे. कोकण रेल्वेच्या परतावा खिडकीवर एकच कर्मचारी सध्या उपलब्ध असून आगामी उपलब्ध रिझर्वेशन करायचे झाल्यास जाण्याच्या ठिकाणचा पूर्ण पत्ता व दूरध्वनी क्रमांक लिहिणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
कमीत कमी कर्मचारी वर्ग
सध्या याप्रकारचे आरक्षण खिडकीवर काम सुरू असतानाही कोविडच्या पार्श्वभूमीर कोकण रेल्वेच्या सर्व कर्मचाऱयांच्या घरी राहून करण्याच्या उपायांबरोबरच कमीत कमी कर्मचारी कार्यालयात उपस्थित कसे राहतील, याबाबत खबरदारी घेतली जात आहे. तरीही उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करताना कर्मचाऱयांची रोजच्या रोज आरोग्याची दखल घेण्यासाठी त्यांना आरोग्याची रोज हजेरी पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इतर व्यवस्थापनांना अनुकरणीय
कोरोनाच्या अनुषंगाने सर्व कर्मचारी आणि कुटुंबियांची प्रकृतीविषयक नोंद प्रत्येक दिवशी ठेवण्याचे काम कोकण रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे ही नोंद घेण्यासारखी बाब असून याचा कोकण रेल्वेचा एक कर्मचारी म्हणून अभिमानच वाटतो. कोरोनासंदर्भात कोकण रेल्वेकडून कर्मचाऱयांची सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. कत्रांटी कामगारांबाबतही अशीच दक्षता घेतली जात असून याचे अनुकरण इतर कंपन्यांच्या व्यवस्थापनाने करावे, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वेच्या एका अधिकाऱयाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.