खेड / प्रतिनिधी
कोकण मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक रविवारी संपुष्टात आले. 1 नोव्हेंबरपासून सुधारित वेळापत्रक लागू होणार असल्याने सर्वच गाड्यांचा वेग वाढणार असून या गाड्या आता ताशी 110 च्या वेगाने धावणार आहेत. यामुळे विलंबाच्या प्रवासातून प्रवाशांची सोमवारपासून सुटका होणार आहे.
पावसाळ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या.10 जूनपासून रेल्वे गाड्या ताशी 75 च्या वेगाने धावत होत्या. तर तुफानी अतिवृष्टीत ताशी 40 च्या वेगाने गाड्या चालवण्याचे निर्देश लोकोपायलटना देण्यात आले होते. यामुळे पावसाळ्यात गाड्यांचा वेग मंदावला होता. 31ऑक्टोबरला पावसाळी वेळापत्रकाची मुदत संपत आहे. यामुळे रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.