प्रतिनिधी / कणकवली:
टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली. यात कोकण रेल्वेचाही समावेश होता. परंतु आता ज्या गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आल्या, त्या गाडय़ांमधून जास्तीत जास्त 70 टक्के प्रवासी प्रवास करत आहेत. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.
कोरोनामुळे मुंबईच्या प्रवासावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर मर्यादा आल्याने मुंबईतील प्रवाशांना खासगी वाहनावर प्रवासासाठी अवलंबून राहवे लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्व गाडय़ांनी कोकणात यायचं असेल, तर सुमारे 300 रुपये मोजावे लागतात मात्र दुसऱया बाजूला कोकण रेल्वेत बसण्यासाठी मुंबईच्या स्टेशनला यायचं असेल, तर चाकरमान्यांना ‘ओला’ किंवा अन्य खासगी वाहनांसाठी किमान सहाशे रुपये मोजावे लागतात. यामुळे चाकरमानी कोकण रेल्वेने कोकणात येण्यास धजावत नाहीत.
याबद्दल चाकरमानी नितीन साटम म्हणतात, कोरोना काळात मुंबईत चाकरमान्यांची हालत बेकार आहे. सुस्थितीत नोकरी असणाऱया चाकरमान्यांना तेवढी झळ बसत नसेल पण फॅक्टरीत, प्रेस अशा छोटय़ा वर्कमध्ये काम करणाऱया वर्गाला दिवसाचा रोजचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे बहुसंख्येने चाकरमान्यांच्या जगण्याचीच हालत झालेली आहे. अनेक चाकरमान्यांना आपल्या गावी यायचं आहे, परंतु मुळातच पैसा नाही आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही मुंबईत नाही. त्यामुळे खासगी वाहनाला जास्त पैसे देऊन रेल्वे स्टेशनला कोकण रेल्वेत बसण्यासाठी यावे लागत असल्यामुळे अनेक लोक गावी यायचं टाळत आहेत.
कोरोनामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सोडण्यात आलेल्या गाडय़ांचे भारमान कमी आहे. दररोजच्या क्षमतेच्या 70 टक्के प्रवासी प्रवास करत आहेत. अन्यवेळी हीच संख्या एकशे पंचवीस टक्केपेक्षा जास्त असते. त्यामुळेच कोकणातील लोकांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आलेल्या कोविड स्पेशल या गाडीलाही प्रवाशांचा प्रतिसाद फारसा मिळत नाहीय.