जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात आमदार दीपक केसरकर यांची माहिती
खासदार सुरेश प्रभू, राऊत, राणे यांचे ऑनलाईन मार्गदर्शन
सावंतवाडी व्यापारी संघाचा मेळाव्यावर बहिष्कार
प्रतिनिधी / सावंतवाडी:
कोकणच्या विकासासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळाची आवश्यकता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे माजी अर्थराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी येथे सांगितले. जिल्हा व्यापारी महासंघाचा 33 वा मेळावा नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहातील कै. जयंत कुलकर्णी मंचावर जिल्हय़ातील मोजक्याच पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत झाला. मात्र, सावंतवाडी तालुका व्यापारी संघाने त्यांना विश्वासात न घेतल्याने मेळाव्यावर बहिष्कार टाकला. महासंघाच्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मेळाव्यादिवशी व्यापाऱयांनी दुकाने बंद ठेवली. तरी काही केशकर्तनालये सुरू होती.
दरम्यान, हा वादाचा मुद्दा पकडत केसरकर म्हणाले, व्यापारी संघटनेत वाद होणे चुकीचे आहे. मेळाव्याची परंपरा अनेक वर्षांची आहे. ती खंडित करणे चुकीचे आहे. जगावर कोरानाचे संकट आहे. त्यातून अनेक निर्बंध घालण्यात आले. परंतु आता जग बदलले आहे. त्यानुसार जिल्हा व्यापारी महासंघाने व्हर्च्युअल मेळावा घेतला, ही बाब योग्य आहे. मेळावा भरविण्यावरून वाद झाला असेल तर या संदर्भात सावंतवाडी तालुकाध्यक्षांशी बोलून त्यावर तोडगा काढण्यात येईल. तसेच पुढील मेळावा सावंतवाडीत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.
मेळाव्याला नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, नितीन वाळके, परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, पद्मश्री परशुराम गंगावणे, सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष सुनील सौदागर, संदीप टोपले, शशिकांत नेवगी, साक्षी वंजारी, उपाध्यक्ष प्रकाश वाळके, अरविंद नेवाळकर, संजय सावंत, राधिका कासकर, नंदन वेंगुर्लेकर, नीलेश धडाम आदी उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते झाले. तर खासदार सुरेश प्रभू, खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
पर्यायी व्यवसायातही उतरा!
केसरकर म्हणाले, कोरोना काळात व्यापाऱयांचे नुकसान झाले. जादा वीज बिलाचा प्रश्नही आहे. या प्रश्नांसदर्भात व्यापाऱयांचे शिष्टमंडळ घेऊन अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. आता चिपी विमानतळ सुरू होणार आहे. गोव्यातील मोपा विमानतळही सुरू होणार आहे. या बदलाची दखल घेऊन व्यापाऱयांनी केवळ पारंपरिक व्यापारावर अवलंबून न राहता अन्य पर्यायी व्यवसाय सुरू करून आर्थिक प्रगती साधली पाहिजे. त्या दृष्टीने पर्यटन व्यवसाय अधिक पोषक आहे. आज परप्रांतीय येऊन सिंधुदुर्गात व्यवसाय करतात, त्यापेक्षा स्थानिकांनी व्यवसाय केले पाहिजेत. कुठल्या व्यवसायात संधी आहे, त्यानुसार युवकांना प्रशिक्षित करून त्यांना उद्योग व्यवसायासाठी प्रवृत्त केले पाहिजे.
व्यापारी अर्थव्यवस्थेला गती देणारा घटक -सुरेश प्रभू
ऑनलाईन मार्गदर्शनात सुरेश प्रभू म्हणाले, व्यापारी मंडळी समाजाला प्रबोधन करतात. व्यापारी व ग्राहकांचे नाते घरच्यासारखे असते. काही ठिकाणी पिढय़ान्पिढय़ा संबंध जोडलेले असतात. ग्राहक व्यापाऱयाकडे जातो तेव्हा वैचारिक देवाणघेवाण होत असते. स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींबाबत व्यापारी ग्राहकांना मार्गदर्शन करत असतो. व्यापारी हा देशातील सर्व गोष्टींची जाण असलेला वर्ग आहे. मेळाव्यातून सकस विचारधारा उदयास येते. व्यापाऱयांचे प्रश्न समजून घेतले जातात. त्यांच्या शंका दूर केल्या जातात. गेले वर्ष संकटात गेले. व्यापाऱयांना दुकाने बंद ठेवणे भाग पडले. मात्र, ग्राहकांना वस्तू पोहोचविण्याचे मोठे काम त्यांनी केले. लॉकडाऊनमध्ये व्यापाऱयांनी जनतेला मदत केली नसती तर काय झाले असते, याची कल्पना करा.
कंपन्या आणून रोजगार देणार!
व्यापाऱयांनी फक्त व्यापार न करता मुलांना प्रशिक्षण देऊन उद्योगपती करावे. सिंधुदुर्गात स्कोडा कंपनी, फोक्सवॅगन या गाडय़ा बनविणाऱया कंपन्या आणून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. जेवढा व्यापार वाढेल, तेवढी देशाची अर्थव्यवस्था वाढेल. त्या दृष्टीने व्यापारी महत्वाचा घटक आहे. व्यापाऱयांना सरकारी यंत्रणांकडून दिला जाणारा त्रास थांबला पाहिजे. व्यापारातील निर्बंध जेवढे कमी होतील तरच अर्थव्यवस्था वाढेल आणि तरच तरुणांना नोकऱया मिळतील. देशाची अर्थव्यवस्था वाढविण्याचे काम उत्पादक आणि ग्राहकांपेक्षा व्यापारी करतात, असेही प्रभू म्हणाले.
वीज सवलतींबाबत पाठपुरावा करणार- राऊत
खासदार राऊत म्हणाले, कोव्हिड व्हॅक्सिन गोरगरीब, ज्ये÷ नागरिकांना मोफत द्या, अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली आहे. व्यापाऱयांना जीएसटीचा त्रास कमी व्हावा, अशी मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राची 25 हजार कोटी जीएसटीची रक्कम केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे राज्याच्या विकासावर परिणाम झाला आहे. वीज बिलातून व्यापारी व छोटय़ा व्यापाऱयांना सूट देण्याचा प्रयत्न आहे. कुडाळ आयकर कार्यालय कोल्हापूरला हलविण्यात येत होते. ते कुडाळात राहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोकण टुरिझमचा चांगला प्लान तयार होईल. ताज हॉटेलची उभारणी स्थानिक लोकांना संरक्षित करून कसे होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच मुणगे येथे दोन तर मिठबाव येथे एक अशी एकूण चार हॉटेल्स सुरू होऊन लवकरच जिल्हय़ात हॉटेल इंडस्ट्री येईल. रोजगार मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होईल. विमानतळ सुरू करण्याबाबत केंद्रात अधिकाऱयांशी चर्चा सुरू आहे. आठवडय़ातून तीन विमाने उडतील एवढे प्रवासी आहेत. उडाण योजनेत हे विमानतळ आहे. त्यामुळे त्यामुळे तिकीट सवलत आहे. इंडिगो, स्पाईस जेट कंपन्या विमान सेवा देतील. डिजीसीएच्या काही मन्यता आवश्यक असून पाठपुरावा सुरू आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
व्यापाऱयांच्या जिद्दीला सलाम-परब
परिस्थितीला कसे तोंड द्यावे, हे व्यापाऱयांकडून शिकावे. कोरोनाकाळात रेशन दुकाने सोडली तर सर्व व्यापारी वर्गावर वाईट वेळ आली. मात्र, व्यापारी त्यातून सावरले. त्यामुळे त्यांच्या जिद्दीला सलाम करतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून फिरत्या व्यापाऱयांना दहा हजार रुपयांचे कर्ज कसे देता येईल, यासाठी आपण प्रयत्न केला. 1200 हून अधिक कर्ज प्रकरणे करून दिली, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. यावेळी पी. डी. शिरसाट यांनी जादा वीजबिलांमुळे व्यापारी हैराण झाला आहे. त्यामुळे व्यावसायिकांची वीज बिले माफ करा, अशी विनंती केली.
व्यापारी, उद्योजकांचा गौरव
यावेळी सावंतवाडीतील कोल्ड्रींक व्यावसायिक शशिकांत नेवगी यांना महासंघातर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर बांदा येथील मत्स्यविक्रेत्या उद्योजिका राधिका कासकर, आदर्श तालुका व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, आदर्श कार्यकर्ता म्हणून विकास गावकर, आदर्श ग्रामीण व्यापारी संघ म्हणून कडावल व्यापारी संघाचा गौरव केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार नारायण राणे यांनीही मेळाव्याला ऑनलाईन मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक नितीन वाळके यांनी तर स्वागत जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी केले. यावेळी सुनील सौदागर, अन्नपूर्णा कोरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. पद्मश्री परशुराम गंगावणे यांचाही व्यापारी महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. गंगावणे यांनीही मनोगत व्यक्त केले. हा कलेला मिळालेला पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगितले.