टोमॅटो,वांग्याने गाठली पन्नाशी, चाकवत, मेथी : गरगटा ताटातून पळाली : हिरव्या मिरचीचा खर्डा दिसेना :डाळीडुळीच्या आमटीची फोडणी
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचे भूत गेल्या सहा महिन्यांपासून माणसाच्या मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे सर्वसामान्याना जगणे मुश्कील केले आहे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या म्हणीप्रमाणे हातचे काम गेले आणि बाजारात भाज्याने होते नव्हते तेही नेले अशी अवस्था झाली आहे. अंडी 85 रुपये डझन तर कोथींबिरीची पेंडी 30 रुपयाला एक झाली आहे. कोरोनामुळे आलेल्या महागाईत जगायचं कसं असा प्रश्न सर्वसामान्याना पडू लागला आहे.
कोरोनामुळे अनेक प्रश्न निर्माण केले. तब्बल सहा महिने मुक्काम केलेल्या या कोरोनाने आपले जाळे कोष्ठय़ाप्रमाणे विणले आहे. त्या जाळ्यातून सुटण्याची धडपड प्रत्येकजण करत आहे. माणसाचं जगणंच बदलून टाकले आहे. एका बाजूला सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बंद झाला आहे. नवीन रोजगार मिळत नाही. असलेले जमापुंजी संपत आली आहे. घरातले स्वयंपाक घर उजाड पडत चालले आहे. बाजारात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. गृहिणींच्या पुढे आज काय स्वयंपाक करायचा हा असतो. सध्या बाजारात पाहिले असता कोथिंबीरीची पेंडी 30 रुपयाला तर मेथी, चाकवत, पालक या भाज्यांच्या पेंढय़ा चाळीस ते पस्तीस रुपयांना एक आशा मिळत आहेत.पावटा तर पावसाने घालवला.वांगी, टोमॅटो 50 रुपये किलोवर पोहचले आहे.भेंडी 30 रुपये किलो, दोडका चाळीस रुपये किलोने बाजारात मिळतो आहे.दारावर येणाया विक्रीचे दर वेगळेच असतात.त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातली भाजी गायब झाली.डाळीच्या वरणावर समाधान मानावे लागत आहे.गेल्या दोन महिन्यांपूर्वी अंडयाचे दर सर्वसामान्य परवडत होते.आता ती ही 85 रुपये डझन झाली आहेत.
कोठे गेले आंदोलनकर्ते?
नुकतेच कांदा पुराण गाजत आहे.त्यावरून रस्त्यावर उतरून आंदोलन केले गेले.पण कांदा सर्व सामान्यांच्या आवाक्यात थोडा तरी आहे.इतर भाज्या महागल्या आहेत.त्यावर कोणी बोलत नाहीत, अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहे.